Join us  

भाजपाच नंबर १... ग्रामपंचायत निकालानंतर फडणवीसांचा ठाकरेंवर बाण, दिली सखोल आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 7:39 PM

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे.

मुंबई - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात भाजपाच नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे, भाजप नेत्यांकडून सेलिब्रेशन सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन या विजयाचं श्रेय भाजपच्या कार्यकर्ता, पदाधिकारी आणि नेत्यांचं असल्याचं म्हटलंय. तसेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि पंचायतपासून संसदेपर्यंत सगळीकडे भाजपाच आहे. चप्पा चप्पा भाजपा.. असे म्हणत फडणवीसांनी ग्रामपंचायत निवडणुकांतील यशावर प्रतिक्रिया दिली. यावेळी, त्यांनी आपल्या टिकेचे बाण ठाकरेंवर सोडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केलं. 

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. आता, फडणवीसांनी याची आकडेवारीच दिलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे.‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 750 हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले आहे. राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या 1400 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केल्याची माहिती फडणवीसांनी दिली. 

राज्यातील जनतेवर त्यांच्या काळात अतोनात सूड उगविणार्‍या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली, तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, त्यांचे खूप खूप आभार , असे फडणवीसांनी म्हटले. तसेच, या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणार्‍या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सतत प्रवास करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन, ठिकठिकाणचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांचेही अभिनंदन. 

महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो, असे ट्विट फडणवीसांनी केले आहे. 

टॅग्स :भाजपादेवेंद्र फडणवीसशिवसेनाग्राम पंचायत