Join us

'कर नाही, तर डर कशाला?, चौकशी होऊन जाऊ द्या'; एकनाथ शिंदेंचा भाजपाच्या सूरात सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 5:29 PM

ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर सुरुवातीला ताब्यात घेऊन रविवारी रात्री उशीरा ईडीने अटक केली. त्यानंतर ईडीने संजय राऊत यांची न्यायालयाकडे ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 

संजय राऊतांना अटक का केली?; आता ईडीनेच सांगितली यामागील ३ महत्वाची कारणं..!

ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 'कर नाही, तर डर कशाला, चौकशी होऊन जाऊ द्या', असं एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. भाजपाच्या नेत्यांकडूनही घोटाळा केला नसल्यास घाबरण्याचं कारण नसल्याच्या प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनीही भाजपाच्या सूरात सूर मिळवल्याचं दिसून आलं. तसेच तो ८ वाजताचा भोंगा बंद झालाय, आता येणारच नाही, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना लगावला. सध्या एकनाथ शिंदे मराठवाडाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

न्यायालयाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना दरमहा २ लाख रुपये दिले जायचे असा आरोप ईडीने केला आहे. तसेच संजय राऊत यांच्या परदेश दौऱ्यासाठीही प्रविण राऊत यांनी पैसा दिला होता असाही दावा ईडीने केला. २०१०-११च्या दरम्यान संजय राऊतांनी अनेक परदेश दौऱ्यांना फायनान्स करण्यात आले होते, असा आरोपही ईडीने केला.

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी; पाहा न्यायालयात नेमकं काय घडलं!

महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुनिल राऊत हे एक व्यवसायिक आहे, असं युक्तिवाद संजय राऊतांच्या वकिलांमार्फत करण्यात आला. कोठडी द्यायची असेल, तर कमी दिवसांची द्या, अशी मागणीही राऊतांच्या वकिलांकडून करण्यात आला. संजय राऊतांच्या अनेक कंपन्या आहे. सर्व पैसे कायदेशीररित्या आले आहे, असा दावाही यावेळी करण्यात आला.

दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदेशिवसेनाअंमलबजावणी संचालनालय