Join us  

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:05 PM

Uddhav Thackeray: राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

मुंबई- राज्यातील राजकीय घडामोडींनी आता वेग घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीनंतर शिवसेना आमदार- खासदारांच्या बैठकीत ही घोषणा होण्याची शक्यता आहे. 

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

शिवसेनेत आतापर्यंत ५ वेळा पडली फूट; चार घटना घडल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत

गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आसाममध्ये दाखल होताच एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा केला. बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

शरद पवारांनी गृहखात्याला झापलं!

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित करत गृहखात्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- राज्यमंत्री बच्चू कडू

आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे, असं बच्चू कडू म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार