Join us

Maharashtra Political Crisis: “कामाख्या देवीने आम्हाला आशीर्वाद दिलेत, गुवाहाटीला जाऊन पुन्हा दर्शन घेणार”: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 5:52 PM

Maharashtra Political Crisis: छातीवर दगड ठेवून शिवसेनेला वाचविण्यासाठी निर्णय घेतला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले आहेत. यातच आता सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने समर्थपणे उभे असल्याचे दाखवत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा कामाख्या देवीचे दर्शन घ्यायला जाणार असल्याचे म्हटले आहे. 

शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची केले. मग आम्ही बंडखोर कसे? आमदारांच्या भावना अनेकदा बोलून दाखवल्या पण ऐकून घेतल्या गेल्या नाहीत. सत्तेत असूनही आपला पक्ष चौथ्या क्रमांकावर जात होता हे पाहून काळीज तुटत होतं. मग छातीवर दगड ठेवून शिवसेनेला वाचविण्यासाठी निर्णय घेतला. शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी पाठिंबा दिला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आमच्यावर खालच्या शब्दांत टीका करण्यात आली. मात्र, आम्ही आमची पातळी सोडणार नसल्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला. 

गुवाहाटीला जाऊन पुन्हा कामाख्या देवीचे दर्शन घेणार

आम्ही गुवाहाटीला गेलो असताना, तुमच्यातील १०, ५, १५ जण आमच्या संपर्कात होतो, असे सांगितले गेले. मात्र, तिथे सर्वच्या सर्व ५० जण आनंदात होते. मात्र, कामाख्या देवीला ४० रेडे पाठवलेत, अशा प्रकारची खालच्या भाषेतील टीका करण्यात आली. पण कामाख्य देवीचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. कामाख्या देवीने काय केले, हे सर्वांनी पाहिले. पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, हे सरकार बेकायदेशीर आहे, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर एकमेकांमध्ये भांडतील, उरावर बसतील वगैरे काय ही त्यांची बोलणी. काही जणांनी तर आमच्यात फूट पडावी, मतभेद व्हावेत, यासाठी देव पाण्यात ठेवलेत. पण, आमचे आमदार घट्ट आहेत, आमच्यात मतभेद होणार नाहीत, पण हेच आमदार तुमच्यावर भारी पडतील. माझ्याकडे अनेक कलाकार आहेत, काय करतील ते कळणारही नाही, असे एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळएकनाथ शिंदे