Join us  

Rajya Sabha Election 2022: उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; राज्यसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?, राज्याचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:54 AM

सर्वांत पहिले राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदान करणार, त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मतदानाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई- राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या दीड तासात ५० टक्के मतदान पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण १४३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामधून भाजपाच्या ६०हून अधिक आमदारांनी मतदान केल्याची माहिती समोर येत आहे.

सर्वांत पहिले राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदान करणार, त्यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार मतदानाची भूमिका बजावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सुनिल तटकरे आणि मंत्री जयंत पाटील, शिवसेनेकडून सुनिल प्रभू आणि काँग्रेसकडून मंत्री अशोक चव्हाण पोलिंग एजंट असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आता विधानभवनात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळपर्यंत निवडणुकीच्या निकालाबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सात उमेदवारांपैकी कोणत्या एका उमेदवाराचा पत्ता कट होणार, याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. 

महाविकास आघाडीचे सर्व उमेवार निवडून येतील, असा विश्वास पुन्हा एकदा संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत चुरस वगैरे काही नाही. विरोधकांकडून तसा भ्रम निर्माण केला जात असल्याचा दावाही राऊतांनी यावेळी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

काँग्रेस अन् राष्ट्रवादीने मतदानाचा कोटा वाढवला-

धोका नको म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदानाचा कोटा वाढवल्याची महिती समोर आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन मतांचा कोटा वाढवल्याने शिवसेना उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मतं कमी होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची चिंता वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

एमआयएम महाविकास आघाडीच्या बाजूनं-

एमआयएमने महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचे समजले. भाजपला पराभूत करण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे. आम्हीही अनेक विषयांवर भूमिका घेतल्या आहेत.  एमआयएमशी शिवसेनेचे असलेले मतभेद कायम राहणार. मात्र, ते काँग्रेसला मतदान करणार असल्याने काँग्रेसशी त्यांचे एखाद्या विषयावर काही जुळले असेल, तर आम्हाला विरोध करण्याचे कारण नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराज्यसभानिवडणूकमहाराष्ट्र विकास आघाडी