Join us

काँग्रेसकडून सत्तास्थानांचा गैरवापर : दीपक केसरकर

By admin | Published: October 30, 2015 11:05 PM

मतदान कर्मचारी दहशतीखाली

वैभववाडी : काँग्रेस आपल्या ताब्यातील सत्तास्थानांचा गैरवापर करून येथील मतदार कर्मचाऱ्यांना धमकावत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी दहशतीखाली आहेत, असा आरोप पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीच्या प्रचारासाठी पालकमंत्री केसरकर सायंकाळी वैभववाडीत आले असता त्यांनी जयेंद्र्र रावराणे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, राजू शेटये, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, अशोक रावराणे आदी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, वैभववाडीच्या विकासाला विरोध करणारेच येथे येऊन सत्ता मागत आहेत. राणेंच्या टिकेला मी कृतीतून उत्तर देईन. ते त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकदाही निधी आणू शकले नाहीत. तेवढा नियोजनचा निधी आपण पहिल्याच वर्षी आणला आहे. आम्ही सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करु, असे स्पष्ट करीत इतकी वर्षे राणे पालकमंत्री असतानाही वैभववाडी तालुक्यातील एकही पर्यटन स्थळ का विकसित करु शकले नाहीत? असा सवाल त्यांनी केला. महागाईवर बोलणाऱ्या काँग्रेसने आपल्या राजवटीत किती साठेबाजांवर धाडी टाकल्या असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केसरकर पुढे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच वैभववाडी आणि दोडामार्गात महायुतीला पोषक वातावरण आहे. निवडणुकीत दादागिरी करण्याचा त्यांचा काळ संपला आहे. त्यामुळे येथील मतदारांनी धमक्या आणि दबावाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे आपण सावंतवाडी शहर राज्यात उत्कृष्ट बनविले त्याचप्रमाणे वैभववाडी आणि दोडामार्गच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. (प्रतिनिधी) हे अभद्र युतीचे पाप जिल्ह्यातील रस्त्यांची सद्याची स्थिती हे नारायण राणे आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीचे पाप आहे. मात्र, यापुढे जिल्ह्यातील रस्त्यांची कामे दर्जेदारच झालेली दिसतील, असे स्पष्ट करीत रस्त्यांचे खड्डे भरण्याऐवजी खड्डेमय रस्त्यांचे पॅचवर्क केले जाणार आहे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.