Join us

Maharashtra Politics: राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:13 AM

Maharashtra News: भारत जोडो यात्रेत व्यस्त असलेल्या राहुल गांधी यांनी फोन करून विचारपूस केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांवर केलेल्या विधानांचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. भाजप, शिंदे गटाकडून राहुल गांधींवर जोरदार टीका करण्यात आली. यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांमुळे विरोधकांकडून सत्तधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे. यातच राहुल गांधी यांनी रात्री फोन केल्याची माहिती खुद्द संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. 

संजय राऊत यांनी एक ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. भारत जोडोत व्यस्त असुनही  राहुल  यांनी  रात्री  फोन करुनमाझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे  म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय.., असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. 

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे मविआमध्ये धुसफूस

अलीकडेच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले होते. तर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचे काहीच कारण नव्हते. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असे नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. तसेच सावरकरांबाबतच्या राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे मविआमध्ये धुसफूस असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, वीर सावरकरांबाबत आम्हाला अभिमान आहे. इतिहासात काय घडले आणि काय नाही घडले ते चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधी यांनी त्याकडे लक्ष द्यावे. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमची सातत्याने मागणी आहे, असे संजय राऊतांनी नमूद केले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊतराहुल गांधीभारत जोडो यात्रा