Join us  

“महाराजांच्या नावाने मते मागायची, सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपाची पेशवाई वृत्ती”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 4:15 PM

Congress Nana Patole News: विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

Congress Nana Patole News: मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळून महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्चा गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. छत्रपतींता पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधानांनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. अशी माफी मान्य नाही. पुतळा पडला म्हणून माफी मागितली की, भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली की, भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. 

सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपाची पेशवाई वृत्ती

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही. राज्यात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सतेत आल्यावर त्यांचा अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती आहे. 

दरम्यान, गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे, राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत. मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे, ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन होते, असे खासदार शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :सिंधुदुर्गछत्रपती शिवाजी महाराजकाँग्रेसनाना पटोलेनाना पटोलेमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी