Join us  

“मोदी सरकारने कितीही त्रास दिला तरी महाविकास आघाडी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 6:50 PM

महाविकास आघाडी संजय राऊतांच्या पाठिशी, भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई: केंद्रातील भाजपचे सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तरी ते महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार पाडू शकत नाहीत. आघाडीतील तीनही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाहीत, एकजुटीने दडपशाहीचा प्रतिकार करतील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथील एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची स्थापना मोठ्या संघर्षाने झाली आहे. भाजप नेत्यांनी दररोज नवनव्या तारखा दिल्या मुहुर्त काढले पण सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना सरकार पाडता आले नाही. आता पुन्हा एकदा केंद्र तपास यंत्रणांचा गैरवापर करून तोच प्रयत्न पुन्हा सुरु असल्याचे संजय राऊत यांनी उघड केले आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असून भाजपने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि तिन्ही पक्ष एकत्रितपणे भाजपच्या दडपशाहीचा मुकाबला करतील. राज्यातील जनता सर्व उघड्या डोळ्यांनी पाहात असून ते भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असे पटोले म्हणाले.   

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणती अडचण येईल असे वाटत नाही

गेल्या वेळच्या अधिवेशनासारखी यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणती अडचण येईल असे वाटत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडूक पार पडेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर पक्षश्रेष्ठी उमेदवारही जाहीर करतील. तसेच कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होऊ लागले असून, आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कोरोनामुळे सरकार आणि पक्षाच्या कामावर अनेक बंधने नियंत्रणे आली होती. पण आता रूग्णसंख्या कमी होत असल्याने १० मार्चनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांचे जनता दरबार होणार आहेत. काँग्रेस पक्षाचे मंत्री जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत. तसेच मुंबईतील प्रदेश कार्यालयातही मंत्र्यांच्या जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहेत. सरकार आणि पक्षाच्या कामकाजात १० मार्चनंतर बदल करून ते अधिक लोकाभिमुख करण्यात येणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरात व्हावे अशी आमची इच्छा आहे पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच आजारातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे नागपूर ऐवजी मुंबईत अधिवेशन होतेय. ते अधिवेशनापर्यंत ठणठणीत बरे झाले तर ठिकाण बदलता येईल. अधिवेशन कुठे होते यापेक्षा विदर्भाचे प्रश्न सुटतात की नाही हे महत्त्वाचे आहे. अधिवेशन मुंबईत झाले तरीही विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेच्या हिताचे तिथल्या विकासाला चालना देणारे निर्णय महाविकास आघाडी सरकार घेईल. मराठवाडा, विदर्भातील औद्योगिक वापराची विद्युत बिलाची सब्सीडी सुरु ठेवण्यात यावी तसेच कृषी पंपासाठी दररोज १२ तास सुरळित वीजपुरवठा करण्यात यावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आहे. विदर्भाचा मुख्यमंत्री असताना विदर्भाचा विकास झाला नाही, विधानभवन पाण्यात बुडाले होते. त्यांनी विदर्भाच्या विकासाची काळजी करू नये महाविकास आघाडी विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

टॅग्स :महाविकास आघाडीनाना पटोलेकाँग्रेसराजकारण