Join us

“विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला काँग्रेसच विजयी होईल”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 16:47 IST

Congress Nana Patole News: या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभेसाठी जोमाने तयारी करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Congress Nana Patole News: तेलंगण विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध अजेंड्याला दक्षिण भारतात स्थान नाही हेच येथील जनतेने दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

विधानसभा निकालावर टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, चार राज्यातील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चारही राज्यात भरपूर मेहनत घेतली होती पण लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो, तो आम्ही नम्रपणे मान्य करतो. या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल

विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तिसगडमध्येही विजयी झाला होता व भाजपाचा मात्र पराभव झाला होता ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्याप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल व काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :काँग्रेसनाना पटोलेनाना पटोलेनिकाल दिवस विधानसभा निवडणूक