Join us  

आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा; विजय वडेट्टीवारांचे महायुतीला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 2:15 PM

Congress Vijay Wadettiwar On Reservation Issue: आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा थयथयाट सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Congress Vijay Wadettiwar On Reservation Issue: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. परंतु, विरोधकांनी या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला. यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात आली. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. यातच आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा, असे आव्हान काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.

पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीचे पितळ उघडे पडेल, या भीतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा हा थयथयाट सुरू आहे. महायुतीत २०० च्यावर आमदार आहेत. तरी आरक्षणाचा प्रश्न महायुती सरकार सोडवत नाही. उलट सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केली. 

आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा

मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतु सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. म्हणून आरक्षण प्रश्नावर सरकार सभागृहात बोलत नाही. खरे तर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे महायुतीने सत्तेतून बाहेर पडावे, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान, सरकारने आंदोलकांना काय आश्वासन दिले, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले नाही. मुख्यमंत्री अधिवेशन सुरू असताना आरक्षणप्रश्नी बैठक बोलावतात. त्यापेक्षा त्यांनी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आम्ही वाचा फोडत आहोत. त्यामुळे गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :विजय वडेट्टीवारकाँग्रेसमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडीओबीसी आरक्षणमराठा आरक्षण