Join us  

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 7:52 AM

४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांचे लोकार्पण

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी रविवारी येथे केले.

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयअंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर’ लोकार्पण सोहळा झाला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, नागपूर येथून व्हीसीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. मान्यवरांनी संविधान संग्रहालयाचीही पाहणी केली. 

परिसरात वृक्षारोपण

राज्यात ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण हा उपक्रम स्तुत्य असल्याचे धनखड यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही झाले.

योजनांमुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल ही पहिली शाळा आहे, ज्या शाळेने देशातील आजच्या कौशल्य विकास विभागाचा पाया घातला.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, रोजगार मेळावे यांसारख्या अनेक नावीन्यपूर्ण योजना कौशल्य विकास विभागाने  सुरू केल्या आहेत, ज्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रनिर्माणाचा हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल कौशल्य विकास विभाग आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिनंदन केले. 

‘भारतीय संस्कृतीचे सार संविधानात’

उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे.

वंचितांच्या विकासासाठी डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणे गरजेचे आहे.

डॉ. आंबेडकर यांचे योगदान नव्या पिढीला समजणे गरजेचे असून त्या दृष्टीने संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल.