CoronaVirus परदेशातून आलेले भारतीय हॉटेलमध्ये क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 21:49 IST2020-05-07T21:49:40+5:302020-05-07T21:49:50+5:30
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉक डाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत.

CoronaVirus परदेशातून आलेले भारतीय हॉटेलमध्ये क्वारंटाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यामुळे बहुतांशी देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने मुंबईतील ८८ हॉटेलमध्ये तीन हजार ३४३ कक्ष आरक्षित केले आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉक डाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचा भाग म्हणून १२ देशातून अंदाजे ६४ विमान फेऱ्यांमधून एकूण १४ हजार ८०० प्रवासी भारतात येणार आहेत. यापैकी बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून सुमारे १९०० नागरिक मुंबईत येतील, असा पालिकेचा अंदाज आहे.
मात्र या नागरिकांना मुंबईत प्रवेश दिला तरी त्यांना कोरोना चा संसर्ग झालेला नाही, याची खात्री करून घेण्यात येणार आहे. यासाठी
खबरदारीचा उपाय म्हणून या नागरिकांना क्वारंटाईन केले जाणार आहे. या कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोना बाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल. क्वारंटाईनसाठी मुंबईतील विविध ८८ हॉटेलमध्ये एकूण ३,३४३ कक्ष आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन/ तीन/ चार /पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचा देखील समावेश आहे.