Join us  

मुंबईत महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे घटले, अद्याप नियंत्रण नाही; सायबर गुन्ह्याचे आव्हान वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 8:26 AM

लॉकडाऊनच्या काळात रोडावलेली गुन्हेगारी अनलॉकच्या काळात पुन्हा जैसे थे स्वरूपात आली. यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही डोके वर काढताना दिसून आल्या. यात महिला संबंधित ४ हजार ५३९ गुन्ह्यांची नोंद झाली असून, ३ हजार ५०७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

 

मुंबई :  महिलांवरील अत्याचार संबंधित गुन्हे  २०१९च्या तुलनेत  १८९९ने कमी झालेले आहेत; मात्र अद्याप पूर्णपणे नियंत्रण आलेले नाही. तर दुसरीकडे मुंबईत सायबर गुन्हेगारीचे आव्हान कायम आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मुंबईत ५१ हजार ६८ गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद झाली. यापैकी ४० हजार ३९० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०१९ मध्ये हाच आकडा ४१ हजार ९३१ होता. यात हत्या (१४८), हत्येचा प्रयत्न (३४८), दरोडा (१५), सोनसाखळी चोरी (७५२), खंडणी (२०४), घरफोडी (१,६४५), चोरी (३,४३३), वाहन चोरी (२,८०१),  दुखापत (३,८०८), दंगल (३२४), बलात्कार ( ७६७), विनयभंग (१,९४५) तर अन्य गुन्हे (३४,८७८) गुन्ह्यांचा समावेश आहे.(Crimes of atrocities against women have decreased in Mumbai)लॉकडाऊनच्या काळात रोडावलेली गुन्हेगारी अनलॉकच्या काळात पुन्हा जैसे थे स्वरूपात आली. यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही डोके वर काढताना दिसून आल्या. यात महिला संबंधित ४ हजार ५३९ गुन्ह्यांची नोंद झाली असून, ३ हजार ५०७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ६ हजार ४३८ गुन्ह्यांची नोंद होती. अशात हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी ४५४ गुन्हे नोंद झाले असून त्यापैकी २२० प्रकरणाची उकल करण्यात आली. २०१९ मध्ये ६०३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यात एका विवाहितेची हुंड्यासाठी हत्या करण्यात आली तर १२ जणींना जीव गमवावा लागला. याप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरवत १० प्रकरणात कारवाई करण्यात आली. नेहमीच्या जाचाला कंटाळून २० जणींनी स्वतःचे आयुष्य संपविले. यात नवविवाहितांचाही समावेश आहे. तर या व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी १८ जणींची हत्या करण्यात आली आहे. तर १९ जणींनी आत्महत्या केली आहे. 

१०० मुलींचे गूढ कायममुंबईतून गेल्या वर्षभरात  ७७३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. यापैकी ६७३ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहेत. यात १०० मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम असून पोलीस अधिक तपास करत आहेत. २०१९च्या तुलनेत याचे प्रमाण कमी आहे.

- मुंबईत गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारी संबंधित २ हजार ४३५ गुन्ह्यांची नोंद झाली. यापैकी अवघ्या २०७ गुन्ह्यांचा उलगडा झाला. २०१९ मध्ये दाखल २ हजार २२५ गुन्ह्यांपैकी २८४ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. यात, स्पूफिंग मेल (१४), फिशिंग, हँकिंग  (३७), अश्लील ई-मेल्स, एसएमएस, एमएमएस (२४७), फेक सोशल मीडिया (३०), क्रेडिट कार्ड फसवणूक (५५८) गुन्ह्यांचा समावेश आहे.  

महिलांविरोधी गुन्ह्यात मुंबई दुसऱ्या क्रमांकावरएनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील घेतलेल्या गुन्हेगारीच्या आढाव्यात, २०२९ च्या आकडेवारीनुसार, महिलांविरोधी गुन्ह्यांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर (१२ हजार ९०२) तर मुंबई दुसऱ्या क्र मांकावर (६ हजार ५१९) आहे. नागपूर शहरात ११४४ गुन्हे नोंद झाले आहेत. असे असले तरी नागपुराचे गुन्हे प्रमाण मुंबईपेक्षा जास्त आहे. तसेच नागपूर शहरात महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित ९६ टक्के  खटले प्रलंबित असून दोषसिद्धी दर १० टक्क्यांहून कमी आहे. मुंबईतला दोषसिद्धी दर ३० टक्क्यांवर आहे.

टॅग्स :महिलाविनयभंगगुन्हेगारीपोलिस