Join us  

मृत्यूचा आकडाही वाढतोय, सर्वाधिक धोका ज्येष्ठांना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 2:50 AM

राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या २२ जणांपैकी मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २ आणि सोलापूरचा १ रुग्ण आहे. या मृत्यूंपैकी १३ पुरुष तर ९ महिला आहेत.

मुंबई : राज्यात रुग्णसंख्येप्रमाणे मृत्यूचा आकडाही वाढताना दिसत आहे. राज्यात रविवारी २२ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १५२ झाली आहे. राज्यातील मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहेत. कोरोनासह मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा आणि हृदयविकारांसारखे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांचे मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.

राज्यात मृत्यूमुखी पडलेल्या २२ जणांपैकी मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २ आणि सोलापूरचा १ रुग्ण आहे. या मृत्यूंपैकी १३ पुरुष तर ९ महिला आहेत. सहा जण हे ६० वर्षांवरील आहेत १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एकजण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या २२ पैकी २० रुग्णांमध्ये ( ९१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे.इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील २६ जण करोना बाधित आढळले होते. यातील २४ जणांना आता पर्यंत घरी सोडण्यात आले आहे. इस्लामपूरात साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण झाले़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई