Join us  

विजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू

By admin | Published: July 29, 2014 1:06 AM

एसआरएअंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक केबिनजवळ साचलेल्या पाण्यातील वीजप्रवाहामुळे धक्का बसून सौमित्रा आलीत स्वेन (२२) या तरुणीचा मृत्यू झाला

मनीषा म्हात्रे, मुलुंडएसआरएअंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी इलेक्ट्रिक केबिनजवळ साचलेल्या पाण्यातील वीजप्रवाहामुळे धक्का बसून सौमित्रा आलीत स्वेन (२२) या तरुणीचा मृत्यू झाला. ती आयटी कंपनीत डेव्हलपर पदावर नोकरीसाठी रु जू झाली होती. मुलुंड (पूर्व) येथील आझाद नगर परिसरातील पुरुषोत्तमवाडीत सौमित्रा तिचे आईवडील आणि लहान भावासोबत राहत होती. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सौमित्रा नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरात पाणी साचले होते. शौचालयाच्या परिसरात साचलेल्या पाण्यातील वीजप्रवाहामुळे तिला विजेचा धक्का बसला. बचावासाठी ती आरडाओरड करीत होती. त्याचदरम्यान नजीकच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या ओमप्रकाश चौरासिया या तरुणाने सौमित्रा पाण्यामध्ये तडफडत असल्याचे पाहिले. त्याने झाडू तसेच काठीच्या साहाय्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वीजप्रवाह अधिक दाबाचा असल्याने त्याला तिच्यापर्यंत पोहोचणे कठीण होत होते. अखेर १५ मिनिटे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर त्याने तिच्या वडिलांना कळविले. मात्र तोपर्यंत ती पाण्यात बेशुद्धावस्थेत पडली होती. तिला बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच सौमित्रा मृत झाल्याचे घोषित केले. ही माहिती मिळताच महावितरण अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. केबिनमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत अधिक तपास करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश गायकवाड यांनी दिली. सौमित्राचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. सौमित्राच्या मृत्यूस जबाबदार कोण, असा सवाल तिचे नातेवाइक करीत आहेत. तर गेल्या सहा वर्षांपासून एसआरए प्रकल्पांतर्गत आमची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी सुभाष सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. याबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याच्या आरोप त्यांनी केला. याबाबत मुलुंड महावितरण कार्यकारी अभियंता मधुसूदन वाडे यांनी अधिक चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. हे प्रकरण एसआरएअंतर्गत येत असून या प्रकरणातील संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे. याबाबत घटनेची दखल घेतली जाणार असल्याचे मुलुंड टी विभाग साहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.