Join us

शाळांची एनओसी रद्द करण्याचा निर्णय निव्वळ धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:05 AM

आमदार अतुल भातखळकर यांचे टीकास्त्रलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाकाळात भरमसाठ फी वाढ करणाऱ्या, पालकांकडे फीकरिता तगादा लावणाऱ्या ...

आमदार अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाकाळात भरमसाठ फी वाढ करणाऱ्या, पालकांकडे फीकरिता तगादा लावणाऱ्या व फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरणाऱ्या मुंबई-नवी मुंबईतील आठ शाळांची एनओसी रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. हा प्रकार म्हणजे निव्वळ धूळफेक व पालकांची फसवणूक असल्याची टीका भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी कायद्यात सुधारणा करून फीमध्ये ५० टक्के सवलत देत राज्यातील पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

शाळांच्या फी वाढीविरोधात तक्रार करण्यासाठी असलेल्या विभागीय शुल्क समित्या जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या दणक्याची वाट पाहणाऱ्या राज्य सरकारने शाळांच्या कारवाईचा थापेबाजपणा बंद करावा, या शाळांचा एनओसी रद्द करण्याअगोदर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुठे जायचे, याचा खुलासा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी करावा.

कोरोनाच्या सुरुवातीपासून मी व भाजपने वारंवार पत्र लिहून, आंदोलन करून व सभागृहात मागणी करूनसुद्धा राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियम) कायद्यात सुधारणा केली नाही. केवळ शासन निर्णय व परिपत्रक काढायचे किंवा शाळांवर कारवाईचा दिखावा करायचा इतकेच काम महाविकास आघाडी सरकार करत आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

यासंदर्भात भातखळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, राज्यातील विद्यार्थी-पालकांना फीमध्ये सवलत मिळवून देण्यासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.