Join us  

राज्य सरकारच्या निर्णयामुळे SRA प्रकल्पात MIDC सह चार पालिकांना ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 7:54 AM

मुंबई, ठाणे महापालिकेसह म्हाडा, एमएमआरडीए, सिडकोमार्फत भागीदारीत पुनर्वसन

नारायण जाधवनवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील विविध शहरातील झोपडपट्ट्यांचे एसआरएद्वारे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यात मुंबई, ठाण्यासारख्या शहरांत अनेक ठिकाणी बिल्डरांनी काढता पाय घेतल्याने आता गृहनिर्माण विभागाने एसआरए योजना मुंबई, ठाणे या महापालिकांसह एमएआरडीए आणि सिडकोमार्फत भागीदारी तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गरीब झोपडीवासीयांची यातून फसवणूक होऊ नये, हा राज्य शासनाचा उद्देश असला तरी यातून नवी मुंबई, केडीएमसी, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर व पनवेल या महापालिकांना ठेंगा दाखविण्यात आला आहे. त्या इच्छुक असल्यास सहभागी होऊ शकतात, असे ढोबळ आदेश गृहनिर्माण विभागाने दिले आहेत.

या स्थानिक स्वराज्य संस्था करारनामा करून भागीदारी करून एसआरए योजना राबवू शकतात, असे गृहनिर्माण विभागाने म्हटले आहे. या करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रस्तावाची छाननी करून मान्यता देण्यासाठी गृहनिर्माण, नगरविकास, झोपु आणि संबधित स्थानक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. मुंबई आणि ठाणे शहरांत अनेक ठिकाणी रखडलेल्या एसआरए प्रकल्पातून बिल्डरांनी काढता पाय घेतल्याने अनेक ठिकाणचे झोपडपट्टीवासी बेघर झाले असून एकीकडे एसआरएत झोपडी गेली अन् मिळणारे घर ही लटकले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. 

अन्य पालिकांना वगळले?गृहनिर्माण विभागाने याबाबतच्या निर्णयात एमएमआर क्षेत्रातील नवी मुंबई, केडीएमसी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल महापालिकेेस ठेंगा दाखविला आहे. त्यांचा शासन निर्णयात उल्लेख नाही. मात्र, एमएमआर क्षेत्रातील इतर प्राधिकरणे आणि महापालिका त्यांच्या इच्छेनुसार सहभागी होऊ शकतात, असे त्यात म्हटले आहे.

नवी मुंबईत येणार अडचणीनवी मुंबईतील बहुतांश झोपडपट्ट्या या एमआयडीसीच्या जागेवर वसल्या आहेत. तर शहराचे नियोजन व विकास प्राधिकरण नवी मुंबई महापालिका आहे. मात्र, झोपड्यांचे एसआरएद्वारे पुनवर्सनासाठी जो आदेश काढला, त्यात या दोघांचा उल्लेख नाही. नवी मुंबईत ज्या दिवशी हा आदेश काढला त्याच दिवशी चिंचपाडा झोपडपट्टीपासून एसआरएच्या बायोमॅट्रिक सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. एसआरए तो करीत आहे. मात्र, यात एमसआयडीसी आणि महापालिकेस विचारात घेतलेले नाही. यामुळे भविष्यात येथे अडचणी येऊ शकतात.