लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सतत बदलणाऱ्या कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटमुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. यात आता डेंग्यूच्या विषाणूतही बदल दिसून येत असल्याचा इशारा औरंगाबादमध्ये देण्यात आल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. रुग्णाच्या शरीरात डेंग्यूची लक्षणे आढळून येत असली तरीही डेंग्यूची चाचणी मात्र निगेटिव्ह येत आहे. मुंबईत या नव्या व्हेरिएंटचा धोका नसून साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली
डेंग्यू हा डासांपासून पसरणारा विषाणूजन्य गंभीर आजार आहे. डी १, डी २, डी ३ आणि डी ४ या चार डेंग्यूच्या विषाणूंमुळे शरीरात ताप उद्भवतो. या चारही प्रकारच्या तापांचे गुणधर्म सारखेच असतात. सध्या व्हायरल फीवरची साथ सुरू आहे. इलायझा या चाचणीद्वारे डेंग्यूचे निदान केले जाते. एनएस १ अँटिजन आढळून आल्यास डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट होते. रॅपिड टेस्ट ही कोणत्याही व्हायरल फीवरमध्ये पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते.
शहर उपगरात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे ३०५ रुग्ण आढळले आहेत. मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ४ लाख ४६ हजार ७७ घरांची तपासणी केली असून, ४ हजार १०८ घरांत उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. मुंबईत डेंग्यूच्या नव्या व्हेरिएंटचा धोका नसून साथीच्या आजारांच्या नियंत्रणाकडे पालिकेची करडी नजर असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
अनेक रुग्णांमध्ये डेंग्यूसारखीच लक्षणे दिसून येत आहेत. परंतु डेंग्यूची चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह येत आहे. रुग्णाच्या शरीरात प्लेटलेटचे प्रमाण कमी होणे, खूप ताप येणे, अंगावर चट्टे येणे, थंडी वाजून येणे आदी लक्षणे दिसून येत आहेत, अशी माहिती पॅथॅलोजिस्ट डॉ. मीनाक्षी कौशिक यांनी दिली.
चौकट
ताप नसताना पॉझिटिव्ह
ताप, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, खाज सुटणे, अशक्तपणा वाटणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. मात्र ही लक्षणे दिसत नसतानासुद्धा डेंग्यूची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह येत आहे.
प्लेटलेट्स कमी नाही, तरी पाॅझिटिव्ह
डेंग्यूची लागण झाल्यानंतर साधारणत: बऱ्याचे रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होतात. मात्र, काहींना या आजाराची लागण झाल्यानंतरही त्यांच्या प्लेटलेट्स कमी होत नसल्याचे डॉक्टर आणि पॅथाॅलाॅजीच्या तज्ज्ञांनी सांगितले. डेंग्यूचा २ टाइप हा प्रकार थोडा धोकादायक आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.