Join us  

"लोकमत सरपंच ॲवॉर्ड" विजेत्या गावांना २५ लाखांचा विकास निधी; ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 5:22 PM

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी "लोकमत सरपंच ॲवॉर्ड" सोहळा पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना "लोकमत सरपंच ॲवॉर्ड" मिळालेला आहे, अशा ग्रामपंचायतींना २५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. 

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गुरुवारी "लोकमत सरपंच ॲवॉर्ड" सोहळा पार पडला. या सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील १८ सरपंचांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना महाजन यांनी ही घोषणा केली.

गिरीश महाजन यांच्यासह या सोहळ्याला कृषीमंत्री धनंजय मुंडे, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट काम करणाऱ्या सरपंचांना पुरस्कार देण्याची लोकमतने राज्यभरात चांगली प्रथा सुरू केल्याबद्दल  महाजन यांनी लोकमतचे अभिनंदन केले. या पुरस्कारासाठी गावा-गावात स्पर्धा लागते, त्यातून गावच्या विकासासाठी सरपंच झटत असतात त्यामुळे लोकमतने या पुरस्काराच्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी हातभार लावला असल्याचे महाजन यावेळी म्हणाले.

शहरातील सौंदर्य बघितले की देश सुंदर आहे असे आपण म्हणतो. पण ग्रामीण भागावर देशाचे खरे सौंदर्य अवलंबून आहे. परदेशातील ग्रामीण भाग शहरांप्रमाणे सुंदर आणि स्वच्छ आहे. तसाच आपल्याकडील ग्रामीण भाग स्वच्छ सुंदर असला पाहिजे. त्याची सर्वात पहिली जबाबदारी सरपंचाची आहे, असेही महाजन यावेळी म्हणाले.

सरपंचांच्या कामाचा गौरव करतानाच त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीवही महाजन यांनी यावेळी करून दिली. ग्रामीण भागात उद्धार करायचा असेल तर महिला हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी बचतगटांना सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. राज्यातील अनेक बचत गट आपली उत्पादने निर्यात करत असून त्यांची उलाढाल कोट्यवधीच्या घरात आहे. बचत गटांना मदत करण्याचे, त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम सरपंचांनी केले पाहिजे. सरकारची भूमिका आहे सगळी गावे हगणदारीमुक्त झाली पाहिजे, प्रत्येकाच्या घरी शौचालय असले पाहिजे त्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही महाजन यावेळी म्हणाले.

आमच्या सरकारने लोकांमधून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सरपंच निवडीमध्ये अनेक गैरप्रकार व्हायचे, त्यातून गावच्या विकासाला खीळ बसायची. मात्र आता थेट सरपंच नियुक्तीमुळे सरपंच मोकळेपणाने काम करू शकतो आणि त्यातून गावचा विकास होतो. पूर्वी सहा-सहा महिन्यात सरपंच बदलायचा, असे सांगत आपणही सरपंच म्हणून काम केल्याची आठवण महाजन यांनी यावेळी सांगितली.

टॅग्स :मुंबईगिरीश महाजननाना पाटेकरधनंजय मुंडे