Join us  

Devendra Fadanvis: "ते जरुर पर्यावरणमंत्री असतील, पण सगळा अभ्यास त्यांनीच केला असं होत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 5:20 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले.

मुंबई - राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी, गणेशोत्सव असे मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या उत्सवांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने यावर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी, मेट्रो कारशेडसंदर्भातही देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड आरेमध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर, शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केला असून, आरे वाचवा हे आंदोलन पुन्हा सुरू केले. या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. यासंदर्भात फडणवीस यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. 

पर्यावरणवादी उच्च न्यायालयात गेले, त्यावेळी त्यांच्याविरोधात निकाल दिला. ते एनजीटी आणि सर्वोच्च न्यायालयात गेले, तिथेही त्यांच्याविरोधात निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने निकालात लिहिलं आहे की, जी झाडं आपण कापली, ती त्यांच्या संपूर्ण जीवनात, लाईफ स्पॅनमध्ये जेवढं कार्बन फिक्स्टेशन करतील, तेवढं ही मेट्रो 80 दिवसांत करेल. जवळजवळ 2 लाख मेट्रीक टन एवढं कार्बन उत्सर्जन आपण थांबवणार आहोत. ही मेट्रो थांबवणं म्हणजे मुंबईकरांचं आयुष्य कमी करण्यासारखं आहे. याशिवाय देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणीही नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पर्यावरणवाद्यांचा आम्ही आदर करतो, पण ठाकरे सरकारने केवळ इगोसाठी हा निर्णय बदलला होता, असेही ते म्हणाले.   

कांजूरमार्ग येथेच मेट्रोचं कारशेड झालं तर मिठी नदीला पूर येईल, असे आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. ते जरूर पर्यावरणमंत्री असतील, पण याचा अर्थ त्यांनीच सगळा अभ्यास केलाय, असा होत नाही. या कारशेडसंदर्भात सगळा अभ्यास झालेला आहे. मिठी नदीला पूर मेट्रो कारशेडमुळे येईल असं नाही. तर, मुंबई महापालिकेनं दिलेल्या अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकाम परवान्यामुळे होत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. यावर लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

यंदा निर्बंध नाहीत, पण नियम पाळा

गणेशोत्सव आणि दहीहंडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज अतिशय महत्वाची बैठक झाली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण उत्सवांवर मर्यादा होत्या. निर्बंध होते. इच्छा असूनही उत्सव साजरे करता आले नाहीत. यावर्षी मात्र सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षांतील मर्यादा पाहता यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्साहात साजरे झाले पाहिजेत, असा कल दिसून आला. त्यामुळे यावर्षी सर्व उत्सव निर्बंधांविना साजरे होतील. कायदा सुव्यवस्था राखून सण साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस