Join us  

"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 5:49 PM

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray, Mumbai Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा उद्धव ठाकरेंकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला.

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray, Mumbai Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्यासाठी मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान सुरु आहे. या टप्प्यात अनेक बूथवर इव्हीएम बिघडल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक बूथवर मतदानाला उशीर होत असल्याचा आरोप केला जात आहे. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. "निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून खूप दिरंगाई होत आहे. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर करत आहे. आम्हाला मतदान होऊ शकते अशा भागातच इव्हीएम बिघाड किंवा इतर अडचणी होत आहेत", असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

"मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका," असे ट्विट करत फडणवीसांनी मुंबकरांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, याआधी आदित्य ठाकरे यांनीही मतदान प्रक्रिया संथगतीने होत झाल्यामुळे आरोप केले होते. "निवडणूक आयोगाकडून योग्य नियोजन केलेले नाही. पोलिंग बूथवर आवश्यक सुविधा नसल्याने मतदानाचा टक्का घसरला आहे. मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईकर मतदानासाठी रस्त्यावर उतरत नाही अशी नेहमी टीका केली जाते. पण आज मुंबईकर मतदानासाठी उतरले आहेत. निवडणूक आयोगाकडून मुद्दाम मतदान प्रक्रिया संथगतीने केली जात आहे. खरे पाहता मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आज आमचा नव्हे तर लोकांचा दिवस आहे. मी पत्रकारांना सांगतो की त्यांनी बूथवर जाऊन आढावा घ्यावा. काही ठिकाणी मुद्दाम संथगतीने मतदान प्रक्रिया केली जात आहे," असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेभारतीय निवडणूक आयोग