विव्हळणाऱ्या रूपालीची मुंबईपर्यंत फरफट

By admin | Published: April 22, 2017 02:16 AM2017-04-22T02:16:56+5:302017-04-22T02:16:56+5:30

तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जनपाडा (वरचापेठा) येथील जि.प. शाळेच्या तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या ९ वर्षांच्या रूपाली वरठा हिला गुरुवारी सायंकाळी

Difficult to understand the morale of Mumbai | विव्हळणाऱ्या रूपालीची मुंबईपर्यंत फरफट

विव्हळणाऱ्या रूपालीची मुंबईपर्यंत फरफट

Next

- हितेन नाईक/ निखिल मेस्त्री, पालघर

तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जनपाडा (वरचापेठा) येथील जि.प. शाळेच्या तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या ९ वर्षांच्या रूपाली वरठा हिला गुरुवारी सायंकाळी तिच्या घराजवळच्या वीजवाहिनीचा झटका लागून ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर उपचार करण्यासाठी तिच्या नातेवाइकांना पालघर, ठाणे, मुंबई असा तब्बल १२ तासांचा प्रवास करावा लागला. सध्या ती मुंबईच्या सायन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
लहानपणीच आईचे छत्र हरवलेली रूपाली आपल्या घराच्या परिसरात खेळत असताना कुंभाची फळे तोडण्यासाठी झाडावर चढली. जवळच्या वीजवाहक तारेचा स्पर्श झाल्याने ती बराच वेळ चिटकून होती. या वेळी रस्त्याच्या कडेला उसाचा रस विकणाऱ्या रंजित रायात व काही ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ महावितरण कर्मचाऱ्यांना फोन करून विद्युतपुरवठा खंडित करून तिला खाली उतरवले. महत्प्रयासाने ठाणे जिल्हा रुग्णालयात रात्रीच्या सुमारास पोहोचल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूतून रक्तस्राव होत असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हलवण्याचे सांगितले. जखमेने विव्हळत असलेल्या रूपालीला १०८ रुग्णवाहिकेने जे.जे.मध्ये नेण्यात आले. तिथे तिला तत्काळ उपचार मिळणे अत्यावश्यक असताना प्रथम कागदपत्रे बनवण्यात खूप वेळ गेला. तिथे तब्बल अर्धा ते पाऊण तास तिला या अवस्थेत ताटकळत राहावे लागले. अशिक्षितपणाचा फटका नातेवाइकांना बसून त्यांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. सर्व सोपस्कारानंतर शेवटी तिला जे.जे.मध्ये दाखल केले. मात्र, जळालेल्या रुग्णासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत तिला दुसरीकडे हलवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुन्हा तिला केईएम किंवा सायनला हलवण्याची तयारी सुरू झाली. मात्र, जे.जे.मध्ये झालेले हाल पाहता रूपालीच्या नातेवाइकांनी नायर जवळ असल्याने तिथे हलवण्याचा निर्णय घेतला. शेवटी, शुक्रवारी सकाळी ९ वाजता नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ५.३० पासून रूपाली मृत्यूशी झुंज देत असताना सुमारे १२ तासांनंतर तिच्यावर खऱ्या अर्थाने उपचार सुरू झाले.

या रुग्णालयातून त्या रुग्णालयात
ग्रामस्थांनी तिला उपचारासाठी मासवणच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, योग्य उपचाराची कमतरता असल्याने त्याच अवस्थेत तिला ग्रामीण रुग्णालय पालघर येथे नेण्यात आले. तिथेही तिच्यावर योग्य उपचारसुविधा नसल्याने शेवटी पालघरमधील ढवळे रुग्णालयात दाखल करून तिच्या जखमांवर तात्पुरती मलमपट्टी करून पुन्हा तातडीने मुंबई येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाइकांना दिला. जवळपास ४० टक्क्यांहून अधिक भाजली असल्याने वेदनेने ती तळमळत असताना मुंबईला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तिला ढवळेतून पुन्हा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉ. म्हात्रे यांनी तिला योग्य उपचार दिले आणि पुढे पर्यायी बर्न केअरसाठी ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात नेण्यास सांगितले.

१०८ रुग्णवाहिकाही ब्रेक डाउन
ठाणे येथे नेण्यासाठी एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. १०८ रुग्णवाहिका ब्रेक डाउन असल्याने तब्बल अर्धा तास तिला ताटकळत राहावे लागले. तद्नंतर, खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्यानंतर सोबत डॉक्टर नसल्याने मासवण प्रा.आ. केंद्रातील एका नर्सला पाठवण्यात आले. या वेळी रूपालीच्या अशिक्षित नातेवाइकोसोबत पत्रकार निखिल मेस्त्री, उपसरपंच अजय पाटील व परिसरातील ग्रामस्थांची मदत झाली.

जीव वाचवण्यासाठी १२ तास संघर्ष
गरिबांसाठी शासन योजना जाहीर करत असल्याचा डांगोरा पिटत असताना एक खासदार, एक कॅबिनेट मंत्री आणि सहा आमदार असलेल्या पालघर जिल्ह्यातील एका गरीब घरातील रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नातेवाइकांना मोठा संघर्ष करावा लागतोय.

आम्ही गरीब आदिवासी असल्याचा काय दोष?
आम्हाला समजत नाही. त्यामुलं हामाला इथं तिथं फिराया लागत आहे. तरी तुम्हीन खूप मदत करेल आहे. इथं आमची पोरी मराया पडेल आहे, ते पाहावं नाय, नं तिथं कागदा गोला कारायाची कोढाक तरास कराया लागत आही. तरी हामचे प्रयत्न सुरूच आहा. हामच्या पोरीस काय नाय होल. अशी आर्त प्रतिक्रिया रूपालीचे वडील काशीनाथ वरठा यांनी लोकमतला दिली.

Web Title: Difficult to understand the morale of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.