Join us  

बालकाच्या हत्येचा चार आठवड्यांनंतर उलगडा

By admin | Published: January 18, 2016 3:10 AM

वडाळ्यातील फरकून शेख या सहा वर्षांच्या बालकाच्या हत्येमागील गूढ उकलण्यास अखेर चार आठवड्यांनंतर पोलिसांना यश आले आहे.

मुंबई : वडाळ्यातील फरकून शेख या सहा वर्षांच्या बालकाच्या हत्येमागील गूढ उकलण्यास अखेर चार आठवड्यांनंतर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात अली आहे. कृष्णनारायण यादव (वय २२), तौसिफ अली तौफिक अली शेख (२४) व मोहम्मद अली सदाफ अली सय्यद (२२) अशी त्यांची नावे असून, फरकूनवर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर त्यांचा गळा दाबून निर्घृणपणे खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. तिघे आरोपी मजुरीचे काम करतात. फरकून शेख हा गेल्या वर्षी १३ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. त्यानंतर गेल्या २४ डिसेंबरला त्याचा मृतदेह चेंबूर येथील पुलाखाली सापडला होता. वडाळा परिसरात आई-वडिलांसोबत राहणारा फरकून हा १३ आॅक्टोबर २०१५ च्या दुपारी घराबाहेर खेळत असताना गायब झाला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वडाळा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तब्बल दोन महिन्यांच्या शोधानंतर २४ डिसेंबर रोजी पूर्व द्रूतगती महामार्गावरील चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या पुलाखालील गॅपमध्ये फरकूनचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. केबल टाकण्याचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मतदेह पाहिल्यानंतर वडाळा पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तसेच घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेताना काही अंतरावर सापडलेली फरकूनची पॅन्ट, बीअरच्या चार बाटल्या, याच्या आधारावरून गुन्हे शाखा कक्ष चारच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू ठेवला होता. गुन्हा घडलेले घटनास्थळ हे सर्व परिचित नव्हते. त्यामुळे तेथे दारू पिणाऱ्या केबल कर्मचाऱ्यांचे हे कृत्य असल्याच्या शक्यतेने १५० जणांकडे चौकशी केली. अखेर बीअर बॉटल्सच्या साहाय्याने त्यांचा माग काढला.