पत्रिका पाहू नका, पण रक्तचाचणी करा!

By admin | Published: May 8, 2017 06:46 AM2017-05-08T06:46:53+5:302017-05-08T06:46:53+5:30

समाज कितीही पुढारलेला असला, तरी आजही लग्नापूर्वी पत्रिका, कुंडल्या जुळतात का, हेपाहण्याची पद्धत

Do not see the magazine, but make blood tests! | पत्रिका पाहू नका, पण रक्तचाचणी करा!

पत्रिका पाहू नका, पण रक्तचाचणी करा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समाज कितीही पुढारलेला असला, तरी आजही लग्नापूर्वी पत्रिका, कुंडल्या जुळतात का, हे
पाहण्याची पद्धत रूढ आहे. मात्र, आजच्या समाजात थॅलेसेमिया या आजाराचीही तपासणी केली पाहिजे.
कारण वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही ‘थॅलेसेमियाग्रस्त’ जन्मतात. त्यामुळे जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने थॅलेसेमियाविषयी समाजातील सर्व स्तरांत जनजागृती आवश्यक असल्याचे मत डॉक्टर मांडत आहेत. त्यातही लग्नापूर्वी वधू-वर दोघांनीही ही चाचणी करून घेणे अत्यावश्यक असल्याचेही डॉक्टर अधोरेखित करतात. वंशपरंपरेने किंवा अनुवांशिकतेने जनुकांद्वारे मात्या-पित्याकडून आपल्याला अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात. यांचे एका पिढीतून पुढच्या पिढीत वहन होत असते. बीटा थॅलेसेमिया व्याधीत १ बिटा थॅलेसेमिया जनुक आई किंवा वडिलांकडून अपत्यात येते व काही वेळा दोघांकडून १/१ जनुक येते. परिणामी, होणाऱ्या बाळाला थॅलेसेमियाची व्याधी होते.
थॅलेसेमियाविषयी डॉ. जयेश लेले यांनी सांगितले की, जनजागृतीसाठी समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांमध्ये प्रभावीपणे ही मोहीम राबविली पाहिजे, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शासकीय आणि अशासकीय पातळीवर याविषयी प्रयत्न झाले पाहिजेत. लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिनची निर्मिती थांबते व त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. अशा स्थितीतील हा आजार गंभीर असतो. यात प्रामुख्याने लोहाची कमतरता आढळते. ही स्थिती अतिरिक्त रक्तस्रावाने उद्भवू शकते. हिमोग्लोबिनचे प्रमाण हे आहारातून मिळणाऱ्या लोहावर अवलंबून असते. ही आनुवंशिक व्याधी आहे. ‘थॅलेसेमिया’ ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. या आजाराचे दोन प्रकार असतात. पहिल्यात व्यक्ती आजाराची वाहक असते. या व्यक्ती एरव्ही निरोगी असतात. याचा सहचारीही वाहक असेल, तर त्यांच्या मुलांपैकी २५ टक्के मुलांना ही व्याधी होऊ शकते. याला ‘बीटा थॅलेसेमिया मेजर’ असे म्हटले जाते. जे वाहक असतील, त्यांना ‘थॅलेसेमिया मायनर’ असे म्हटले जाते.

...तर अपत्य सुदृढ जन्म घेईल
थॅलेसेमिया या आजाराला रोखण्यासाठी वधू-वरांनी लग्नापूर्वी चाचणी केल्यास प्रतिबंधात्मक पाऊल ठरेल. बऱ्याचदा आजही गुण जुळविण्यात व्यस्त असणाऱ्या कुटुंबांची वैद्यकीय तपासणी करणेही तितकेच आवश्यक आहे, याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हे टाळण्यासाठी लग्नापूर्वी रक्तचाचणी केली पाहिजे, जेणेकरून जन्माला येणारे अपत्य सुदृढ असेल.
- डॉ. जयेश लेले


कुणाला होऊ शकतो बीटा थॅलेसेमिया
♦स्त्री आणि पुरुष हे दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांच्या मुलांमध्ये बीटा थॅलेसेमिया आढळून येण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत असते, पण दोघांपैकी कुणी एक जर वाहक असेल, तर मुलांमधून कोणी वाहक होण्याची शक्यता असते.अशा स्थितीत बीटा मेजर व्याधी उद्भवत नाही. जर दोघेही व्याधीमुक्त असतील, तर मुलांमध्ये व्याधी उद्भवू शकत नाहीत.


निदान : व्यक्ती वाहक असल्याचे


निदान रक्त तपासणीतून होते. यासाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिसची चाचणी गरजेची असते. या आजारात वाहकाच्या दैनंदिन जीवनात फारसा बदल होत नाही. अशा व्यक्तींच्या शारीरिक व मानसिक स्थितीत कमजोरी दिसत नाही. या आजाराने बाधित व्यक्तीचा साथीदार जर वाहक असेल, तर त्याच्या मुलांना बीटा मेजर होण्याची शक्यता असते. या आजाराचे प्रमाण ज्या समूहांमध्ये जास्त आहे त्यांमध्ये लग्न ठरण्याआधी स्त्री किंवा पुरुष दोहोंनी रक्ताची चाचणी करून व्याधीचे निदान करणे आवश्यक आहे.

रुग्णांची संख्या वाढतेय

राज्यात थॅलेसेमिया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामध्ये
बालरुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यात २०१२ मध्ये या आजाराचे ३
हजार ६४० रुग्ण होते. मागील पाच वर्षांत वाढ होऊन, या रुग्णांची संख्या ६
हजार ९८४ वर पोहोचली आहे. मागील काही वर्षांत थॅलेसेमिया रुग्णांच्या
संख्येत वाढ होत असल्याचे एकंदर राज्यातील नोंदणीवरून दिसून येत आहे.
मागील वर्षी ५,४३८ वर असणारी संख्या या वर्षी ५९८४ वर पोहोचली
असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी नुकतीच जाहीर केली होती.

Web Title: Do not see the magazine, but make blood tests!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.