Join us

Coronavirus : यंदा अकरावीसाठी शुल्कवाढ नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:57 AM

आर्थिक परिस्थितीत असलेल्या पालकांना अकरावी प्रवेशावेळी तरी दिलासा मिळावा यासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी मागील वर्षापेक्षा अधिक शुल्क आकारू नये.

मुंबई : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाउन सुरू आहे. याच्या परिणामांना सामान्य जनतेलादेखील सामोरे जावे लागत आहे. मुळातच दहावीचा निकाल यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेलाही उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आधीच कोरोनामुळे बिकट आर्थिक परिस्थितीत असलेल्या पालकांना अकरावी प्रवेशावेळी तरी दिलासा मिळावा यासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी मागील वर्षापेक्षा अधिक शुल्क आकारू नये.अधिक शुल्क आकारणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांवर कोणती कारवाई केली जाईल हे जाहीर करावे, अशी मागणी सिस्कॉम या संघटनेकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेकडून आणखी काही मागण्याही मेलद्वारे त्यांना करण्यात आल्या आहेत. ज्या शैक्षणिक संस्थांना शक्य असेल अशा संस्थांनी होतकरू विद्यार्थ्यांना शुल्क माफी देण्याचे आवाहन करण्यात यावे, असे सिस्कॉममार्फत सुचविण्यात आले आहे. तसेच वारंवार शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून पालकांकडे सुरू असलेला शुल्काचा तगादा अजूनही कमी झाला नसल्याने शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संपूर्ण वर्षाचे शुल्क एकरकमी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांकडे तगादा न लावता त्यांना सोयीनुसार शुल्क भरण्याची मुभा मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्वप्राथमिक ते इयत्ता १२वीपर्यंत शुल्क भरता आले नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येणार नसल्याचे शासनाने जाहीर करावे.विद्यार्थ्याला शाळेतून काढल्यास काय कारवाई केली जाईल हे जाहीर करावे, असे सरकारमार्फत जाहीर करण्यात यावे, अशी मागणी सिस्कॉमने केली आहे.तसेच या परिस्थितीत पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने शाळांनी विद्यार्थ्यांकडे चांगल्या स्थितीत असणारी पुस्तके जमा करून घ्यावीत व गरजू विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत. विद्यार्थी पालकांनी शैक्षणिक साहित्य नवीनच घेण्याचा आग्रह करू नये असेही सुचविले आहे.यामुळे पालकांवरील आर्थिक बोजा कमी होऊ शकेल. सद्यपरिस्थितीमध्ये केजी टू पीजी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जावी ही आमच्या संस्थेचीदेखील मागणी आहे. परंतु आजच्या परिस्थितीत बहुतेक पालकांना आॅनलाइन प्रवेशाची माहिती नसताना या पद्धतीने प्रवेशास परवानगी नको, अशी प्रतिक्रिया सिस्कॉमच्या वैशाली बाफना यांनी दिली. दरम्यान, आॅनलाइन येणारे अर्ज जरूर स्वीकारावेत, परंतु प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया लॉकडाउन संपल्यानंतर गुणवत्तेनुसार राबवावी , असे त्यांनी सुचविले आहे.>शिक्षकांना सिस्कॉममार्फत आवाहननववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सहामाही परीक्षेतील गुणांच्या आधारे पुढील वर्गात प्रवेश देण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेत चांगले प्रदर्शन करता आले नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा आॅनलाइन परीक्षा देण्याची संधी देऊन पुढील प्रवेश देता येईल. यासाठी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करावी, असे आवाहनही सिस्कॉममार्फत करण्यात आले आहे.