Join us  

‘जलमार्ग समृद्ध करणार’

By admin | Published: March 19, 2016 2:13 AM

भारताला विशाल समुद्रकिनारा लाभला आहे. रस्ते आणि हवाईमार्गांचा विचार करता जलमार्ग स्वस्त असूनही यांचा हवा तितका उपयोग केला गेला नाही. पण येत्या काही वर्षांत बंदर

मुंबई : भारताला विशाल समुद्रकिनारा लाभला आहे. रस्ते आणि हवाईमार्गांचा विचार करता जलमार्ग स्वस्त असूनही यांचा हवा तितका उपयोग केला गेला नाही. पण येत्या काही वर्षांत बंदर आणि त्या माध्यमातून होणाऱ्या दळण-वळण व्यवसायाचा विकास करून जलमार्ग समृद्ध करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘मेरीटाईम समिट’च्या पत्रकार परिषदेत केले.गोरेगाव येथील बॉम्बे कन्व्हेन्शन अ‍ॅण्ड एक्झिबिशन सेंटर येथे १४ ते १६ एप्रिल या कालावधीत मेरीटाईम इंडिया समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समिटविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गडकरी म्हणाले की, उद्योजकांनीही सागरी मार्गाच्या विकासाकडे वळायला हवे. बंदर आणि दळण-वळणाच्या विकासातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे १ कोटी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. भारताला विशाल समुद्रकिनारा लाभला आहे. जलमार्ग स्वस्त आहे. हे माहीत असूनही याचा उपयोग केला गेला नाही. तसेच परदेशाप्रमाणे बंदरांचा विकास भारतात म्हणावा तितका झाला नाही, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.सरकारच्या महत्त्वपूर्ण सागरी योजनांची माहिती त्यांनी या वेळी दिली. ते म्हणाले की, येत्या काही वर्षांत १११ देशांतर्गत जलमार्ग तयार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील बंदरांचा विकास करण्यात येणार आहे; तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी समुद्रातील लाइट हाउस, हॉटेल्स आणि चित्रपटगृहे सुरू करण्याचा मानस आहे. यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले. (प्रतिनिधी)