Join us

पर्यावरणाला धक्का लागणारच; एमएमआरडीए आयुक्तांचे परखड मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 2:05 AM

रक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबईसारख्या शहरामध्ये पायाभूत सुविधांचा विकास करताना पर्यावरणाला धक्का लागणारच असे स्पष्ट आणि परखड मत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले. पर्यावरणाचे जतन करतानाच पायाभूत सुविधांचा विकासही झाला पाहिजे आणि त्यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईला पायाभूत सुविधांची गरज आहे. त्यासोबतच मुंबईचे पर्यावरण जपणेही आवश्यक आहे. राज्य सरकारने २७५ कि.मी.लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. मेट्रो प्रकल्प पर्यावरण पूरक आहेत आणि पर्यावरणाला फारसे धोक्यात न आणता मुंबईकरांंचा प्रवाससुद्धा सुखकर करू शकणारा आहे. पर्यावरणाचे काहीसे नुकसान होईल हे मीसुद्धा मानतो मात्र ते भरूण काढण्यासाठी पुरेसे नियम, निर्बंध आणि अनिवार्य तरतुदीदेखील आहेत हे विसरता येणार नाही, असेही आर.ए राजीव यांनी स्पष्ट केले.

मेट्रो प्रणालीमध्ये री-जनरेटीव्ह ब्रेकींगचा उपयोग होत असल्यामुळे ३० टक्के उर्जेची बचत होणार आहे. तसेच या प्रकल्पामध्ये पर्यावरण नियंत्रण पद्धतींचा सुद्धा वापर करण्यात येतो. तसेच इंडीयन ग्रीन बिल्डींग काऊंसिलच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते. यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी होते. तसेच मेट्रोसाठी कुठल्याही प्रकारचे जिवाश्म इंधन वापरले जात नसल्याने प्रदुषणामध्ये भर पडत नाही.