लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मतदान यंत्राद्वारे (ईव्हीएम) घेण्यात येणारी मतदान प्रक्रिया अत्यंत सदोष आहे. त्यातून जनतेचा खरा कौल समोर येत नाही. ईव्हीएममध्ये घोटाळा करता येऊ शकतो हे आम्ही प्रात्यक्षिकासह दाखवत आहोत, ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिका हेच कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. त्यामुळे पारदर्शक निवडणुका व्हाव्यात, असे वाटत असेल तर मतदान पत्रिकेवरच मतदान घ्या, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी शनिवारी केली.
मतपत्रिकेवरच मतदान घेण्यात यावे, यासाठी आंदोलन करणारे सोलापूर जिल्ह्यातील मरकड वाडीचे सरपंच रणजीत मरकड, माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, आ. उत्तम जानकर, अॅड. मेहमूद प्राचा, कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला, तिस्ता सेटलवाड, अमीन सोलकर, शरद कदम, धनंजय शिंदे आदी उपस्थित होते. प्रतिकात्मक ईव्हीएम यंत्र सर्वांसमोर तोडून विरोध प्रकट करण्यात आला.