Join us  

‘जलद’चे थांबे वाढणार

By admin | Published: April 18, 2016 2:02 AM

जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी मध्य रेल्वेकडून नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जलद लोकल गाड्यांना आणखी काही स्थानकांवर थांबे देण्याचा

मुंबई : जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी मध्य रेल्वेकडून नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जलद लोकल गाड्यांना आणखी काही स्थानकांवर थांबे देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे प्रवाशांची धावपळ जरी वाचणार असली तरी जलद लोकलचा प्रवास वेळ वाढणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर काही प्रमुख स्थानकांवरच जलद लोकलना थांबा दिला जातो. भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकात थांबा दिला जात असतानाच गेल्या काही वर्षांत विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकांचीही भर पडली. सीएसटी ते ठाणे धीम्या लोकलच्या प्रवासासाठी एक तास तर सीएसटी ते डोंबिवली, कल्याण प्रवासासाठी दीड ते पावणेदोन तास लागतात. मात्र जलद लोकलने सीएसटीपासून ठाणे, डोंबिवली, कल्याणपर्यंतचा हाच प्रवास ४0 मिनिटांपासून ते सव्वा तासात होतो. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी अनेक जण जलद लोकलचा पर्याय निवडतात. धीम्या लोकलने प्रवास करणारे काही प्रवासी तर जलद लोकलचा पर्याय निवडतात आणि जलद लोकल मार्गावरील एखाद्या स्थानकात उतरून तेथून धीम्या लोकलने आपले नियोजित धीमे स्थानक गाठतात. प्रवाशांची धावपळ थांबविण्यासाठी जलद लोकलना काही स्थानकांवर थांबा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे मध्य रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)