पूरमुक्तीसाठी स्थानिक कृती आराखड्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:58 AM2018-07-27T00:58:04+5:302018-07-27T00:58:36+5:30

महापालिकेचा निर्णय; आणखी काही वर्षे तरी ‘तुंबईच’

Focus on local action plan for deletion of flood relief | पूरमुक्तीसाठी स्थानिक कृती आराखड्यावर भर

पूरमुक्तीसाठी स्थानिक कृती आराखड्यावर भर

- शेफाली परब-पंडित 

मुंबई : ‘तुंबई’चे चित्र बदलण्यासाठी गेल्या १३ वर्षांमध्ये या शहरात अनेक प्रयोग झाले. ब्रिमस्टोवड प्रकल्पाने दिलासा दिला, मात्र अंमलबजावणीतील दिरंगाईने समस्यांचे स्वरूप बदलले. त्यामुळे तुंबणाऱ्या पाण्यासाठी स्थानिक पातळीवरच अभ्यास करून कृती करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. या प्रयोगांचे चांगले फलित काही विभागांना मिळाले, मात्र मुंबई पूरमुक्त होण्याची शक्यता सध्या तरी धूसर आहे.
२६ जुलै २००५ रोजी मुंबईत एकाच दिवसात ९४४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यातून शहाणपण घेऊन ब्रिमस्टोवड प्रकल्पाला वेग देण्यात आला. अनेक अडथळे पार करीत साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून गेली. १३ वर्षे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविली, नदी-नाल्यांचे रुंदीकरण आणि आठ पंपिंग स्टेशन बांधल्यानंतरही पुराचा धोका टळलेला नाही.
पावसाळ्यात समुद्राला येणारी मोठी भरती, नीप टाईड, शहराची भौगोलिक स्थिती अशी अनेक कारणे मुंबईची तुंबई होण्यास कारणीभूत आहेत. परंतु वाढत्या काँक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी मुरण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही, त्यामुळे पाणी तुंबण्याची नवीन ठिकाणे निर्माण होत असल्याने महापालिकेपुढील आव्हान वाढले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी तुंबण्याची नवीन ठिकाणे
शोधून त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाºयांना दिले आहेत.

अशा आहेत नवीन अडचणी
काँक्रीटीकरण व बांधकामामुळे पाणी मुरण्यासाठी कुठेच जागा शिल्लक राहिलेली नाही.
पावसाचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढले आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस आणि मोठी भरती आजही मुंबईची नाकाबंदी करते.
भरती व आहोटीच्या मधला काळ म्हणजे नीप टाईडच्या काळात जास्त पाऊस झाल्यास पाणी तुंबते. पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये झाडांची मुळे अडकल्याने पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

असा पूरमुक्त झाला फीतवाला लेन परिसर
पूरमुक्तच्या काही यशस्वी प्रयोगांमध्ये लोअर परळच्या फीतवाला लेनचा समावेश आहे. अति संवेदनशील असलेल्या या ठिकाणी गेल्या वर्षी उघड्या गटारात पडून बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. या भागात साचणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने मलनिस्सारण वाहिनीमध्ये बदल केले. कामगार नगर येथील ७० अतिक्रमणे हटवून त्या ठिकाणी असलेल्या जुन्या तीन वाहिन्यांऐवजी एकच बॉक्स ड्रेन तयार केला. तसेच सेनापती बापट मार्ग ते फीतवाला लेनवरील पर्जन्य जलवाहिन्यांचा आकार वाढविण्यात आला. त्यामुळे दोन दशकांनंतर हा परिसर पूरमुक्त झाला, असा अधिकाºयांचा दावा आहे.

काँक्रिटीकरणावर निर्बंध
विकासकाने बांधकाम करताना काही जागा मातीची ठेवणे आवश्यक आहे. मात्र हा नियम मोडून संपूर्ण बांधकाम केले जाते. त्यामुळे यावर नियंत्रण आण्यासाठी विकास आराखड्यातच याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

असे झाले बदल...
ताशी २५ मि.मी. पाऊस झाल्यास मुंबई तुंबते. त्यामुळे ब्रिमस्टोवड प्रकल्पानुसार पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि.मी. इतकी करण्यात आली. तसेच गटारगंगा झालेल्या नदी व नाल्यांचे रुंदीकरण करण्यात आले. भरतीच्या काळात पावसाचे पाणी उपसण्यासाठी पंपिंग स्टेशन बांधण्यात आले. या उपाययोजनांचा मुंबईतील काही सखल भागांना दिलासा मिळाला. मात्र या प्रकल्पाचे काम १३ वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. आजही मुंबईत सुमारे तीनशे ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे दिसून आले आहे.

पूरमुक्तीसाठी किर्लाेस्कर फॉर्म्युला
मुंबईतील अनेक भाग हे समुद्रसपाटीपासून खाली असून समुद्राला येणाºया भरतीमुळे अनेकवेळा मुंबईची तुंबापुरी होते. यासाठी उपाययोजना राबविण्याची किर्लोस्कर ब्रदर्सने तयारी दर्शवली आहे. बँकॉकमध्ये भरलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा अनेक दिवस होत नव्हता. त्या वेळी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या तंत्रज्ञांनी जमिनीच्या पोटात तयार केलेल्या बोगद्यातून काँक्रीट व्हॅल्यूट पंप बसवून अतिवृष्टी आणि समुद्राच्या भरतीचे संकट रोखण्याची प्रभावी यंत्रणा उभारली होती. अशीच यंत्रणा राबवून मुंबईतील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा पालिकेचा विचार आहे.

पूर्व उपनगराला दिलासा नाहीच
मुंबईत जोरदार पाऊस पडला तर अनेक भागांत पाणी भरते. किंग्ज सर्कल गांधी मार्केट परिसर हा सखल भाग आहे. या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशनची गरज आहे. माहूल येथे पंपिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानगीची गरज आहे. त्यासाठी काही वेळ लागणार असल्याने पूर्व उपनगराला यापुढेही पुराचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Focus on local action plan for deletion of flood relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.