Join us  

पावसाचा आज दंगलवार... हवामान खात्याचे भाकीत; महामुंबईला ऑरेंज तर रायगडला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 6:25 AM

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणपट्ट्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना झोडपून काढणारा पाऊस मंगळवारीही जोरदार कोसळणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणपट्ट्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे मंगळवारी रायगडला रेड तर मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना बुधवारी आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. दक्षिण, दक्षिण मध्य मुंबईसोबतच पूर्व उपनगरात सर्वत्र सकाळी दमदार पाऊस पडला. कुर्ला, सायन, विद्याविहार, घाटकोपर परिसरात दुपारी ३ वाजेपर्यंत अधून-मधून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतही पाऊस लागून राहिला होता. पश्चिम उपनगरात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत होत्या. दुपारी ३ नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचे चित्र होते. दरम्यान, दुपारपर्यंत कोसळलेल्या पावसाने चाकरमान्यांसह पालक आणि विद्यार्थ्यांची कसरत सुरू असल्याचे चित्र होते.

धरणांच्या पाणलोटातही दमदार

ठाणे : गेल्या दाेन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक काेंडीसह उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक काेलमडल्याने नोकरदारांचे हाल हाेत आहेत. पावसाने धरण क्षेत्रातही जाेर धरला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. प्रामुख्याने भातसा धरणात ४९ टक्के तर बारवी धरणात ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

टॅग्स :पाऊस