Join us  

कल्याण रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण

By मुरलीधर भवार | Published: August 08, 2023 1:58 PM

अवघ्या ८ तासात कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने घेतला मुलाचा शोध

कल्याण- कल्याण रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रूममधून सकाळच्या सुमारास ४ वर्षाच्या मुलाचे एकाने अपहरण केले होते. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास सुर करुन अवघा ८ तासात या मुलाचा शोध लावला. त्याला त्याच्याआई-वडिलांची हवाली सूपूर्द केले आहे. पोलिसांनी अपहरणकर्ता कचरू वाघमारे याला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे कचरू वाघमारे याला चार मुली आहेत. मुलाच्या हव्यासापोटी त्याने या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे करण गुप्ता आणि त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे काम करतात . २ वर्षाची मुलगी कीर्ती आणि ४ वर्षाचा अथर्व ही २ मुलेआहे. आज सकाळी कपडे धुण्यासाठी ते कल्याण रेल्वे स्टेशन वरील वेटिंग रूममध्ये आले. मात्र साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर खेळताना सोडून ते साबण घेण्यासाठी स्टेशन बाहेर आले. यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. त्या ठिकाणी एक जोडपे होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेला.

साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. अथर्व व त्यांच्यासोबत खेळत असलेल्या चारही मुली तिथे नव्हत्या. करणने आजूबाजूला आपल्या मुलाचा शोध घेतला मात्र मुलगा आढळून आला नाही. अखेर त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलीस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास एक इसम अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन फलाटावरुन जात असल्याचा आढळून आला.

हा इसम नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होता. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या इसमावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली. चौकशी दरम्यान या इसमाचे नाव कचरू वाघमारे उघड झाले. कचरू वाघमारे याला चार मुली होत्या. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने ४ वर्षाच्या अथर्व अपहरण केल्याची बाब समोर आली. पोलिसांनी कचरूला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.