मुंबई : तुमच्या मुलाचे अपहरण केले असून पाच लाख द्या, अन्यथा मुलाची हत्या करून त्याचे पार्सल घरी पाठवू, अशी धमकी देऊन मालवणीतून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय चिमुकल्याची सुटका करण्यात गुन्हे शाखेला यश आले. अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याची उकल करत खंडणी मागणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केले. यामध्ये एका महिलेसह दोन पत्रकार, उबेर टॅक्सी चालकाचा समावेश आहे. मालाड मालवणी मार्वे क्रॉस रोडवर असलेल्या महाकाली नगरात चार वर्षीय मुलगा कुटुंबीयांसोबत राहतो. मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शिकवणीहून घरी परतत असताना या टोळीने त्याचे अपहरण केले. ‘तुमच्या मुलाचे अपहरण केले असून पाच लाख द्या, अन्यथा मुलाची हत्या करून त्याचे पार्सल घरी पाठविण्यात येईल’ असे सांगून पोलिसांना काहीही न सांगण्याबाबत दम भरला. मुलाच्या अपहरणाची माहिती मिळताच कुटुंबीयांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेचे कक्ष ११ आरोपीचा समांतर तपास करत होते.गुप्त माहितीदारांच्या मदतीने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली, साहाय्यक आयुक्त सुनील देशमुख, प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, हितेंद्र विचारे, सोनावणे यांच्यासह तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. या अपहरणातील दोन आरोपी कांदिवली येथे येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून विरार येथील चंदनसार येथे आरोपी महिला दीपा गुप्ताच्या घरी सापळा रचून मुलाची सुटका केली. त्यापाठोपाठ इतर आरोपींच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.यामध्ये पत्रकार जहीर शेख, संतोष विश्वकर्मासह संजय चव्हाण, अभिषेक झा आणि सलीम शेखच्या मुसक्या आवळल्या. यापैकी चव्हाण हा बी.कॉमचा विद्यार्थी असून दीपा गुप्ता त्याची मैत्रीण आहे. या दोघांवर मुलावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. तर शेख हा पत्रकार असून उबेर टॅक्सी चालक म्हणून कार्यरत आहे. यातील मुख्य सूत्रधार सलीम शेख हा पसार असून गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे. (प्रतिनिधी)
चार वर्षीय अपहृत चिमुकल्याची सुटका
By admin | Published: October 31, 2015 12:45 AM