सफाळे : गेल्या काही दिवसांपासून सफाळे परिसरात दिवस-रात्र वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू असून, नागरिकांसह व्यापारीवर्ग व छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला. याच्याच निषेधार्थ बुधवारी वीज कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी येथील अधिकाऱ्यांना एक निवेदन देवून अवेळी खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात आली.रात्री अपरात्री सतत वीज पुरवठा खंडीत होत आहे. बहुतांशी ठिकाणी वृक्ष कटाईची कामे प्रलंबित असून विजवाहक तारा तुटण्याचे प्रकार घडल्याचे संतप्त नागरिकांमधून सांगण्यात आले. तसेच ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची वीज उपकरणे लावली जात असल्याचे सांगण्यात आले. सततचा वीज वीजपुरवठा खंडीत झाल्याने विद्यार्थी, नोकरदारवर्ग, गृहिणी, व्यापारी, छोटे उद्योजक अशा सर्वांनाच मोठा फटका बसला अहे. यासंदर्भात सफाळे वीज कार्यालयाचे सहा. अभियंता मनिष वाघेला यांच्याशी संवाद साधला असता विभागात ६० ते ७० किलोमीटरचा परिसर येतो. केवळ ११ कर्मचारीवर्ग असून फिजीकली सर्वच ठिकाणी फॉल्ट शोधणे शक्य होत नाही. येत्या आठवड्यात विशेष उपाययोजना करून खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यापासून नागरिकांना मुक्त करू असे आश्वासन वाघेला यांनी नागरिकांना दिले. सदरची समस्या त्वरीत न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडले जावून विजेचा प्रश्न सोडविण्यास सर्वतोपरी प्रयत्न करू असा इशाराही नागरिकांनी दिला. (वार्ताहर)
सफाळ्यात वीज कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: June 18, 2014 11:46 PM