Join us  

"कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता", मनसेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:59 PM

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जवळपास १०३ दिवसांच्या तुरुंगावासानंतर काल जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय राऊत यांचे ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, तुरुंगाबाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी सकाळच्या वेळी माध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरेंवरही निशाणा साधला. 

संजय राऊत म्हणाले की, आज तीन महिन्यांनंतर हातावर घड्याळ बांधले आहे. तुरुंगात घड्याळ वापरण्यास बंदी होती. बाहेर आल्याबरोबर लोकांनी माझे जोरदार स्वागत केले. मला वाटले लोक मला विसरतील. मात्र तसे काही झाले नाही. कालच्या निर्णयानंतर माझा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे. माझ्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई बेकायदेशीर होती. मला अटक होईल आणि एकांतात बोलण्याचा सराव करावा असे राज ठाकरे माझ्याबद्दल बोलले होते. मी त्यांना सांगू इच्छितो एकांतातला काळ मी सत्कारणी लावला. राजकारणात शत्रू तुरुंगात जावा अशी भावना असू नये. सावरकर, टिळकही एकांतात होते. सावरकरांसारखाच मी एकांतात राहिलो. एकांतामधील काळ मी सत्कारणी लावला, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

लवंडे जोमात, मातोश्री कोमात - गजानन काळे राज ठाकरेंवर केलेल्या या टीकेला आता मनसेच्या गजानन काळेंनी प्रत्युत्तर दिले आहे. कालचा पिंजऱ्यातील वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता, अशा शब्दांत काळे यांनी राऊंतावर बोचरी टीका केली. "सूर बदले बदले हैं जनाब के... राजकारणातील अलका कुबल यांना हे पाहून पुन्हा अंधारात अश्रू अनावर होतील... लवंडे जोमात, मातोश्री कोमात...", अशा शब्दांत मनेसेने संजय राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला. 

दरम्यान, तुरुंगाबाहेर आल्यानंतर अनेक नेत्यांकडून आपली विचारपूस झाल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज सकाळी शरद पवारांचा फोन आला होता. त्यांना माझी काळजी होती. इतर अनेकांचेही फोन आले. कालच्या निर्णयानंतर देशात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. मी कुणावरही टीका करणार नाही. कुणाबाबतही तक्रार नाही. जे भोगायचे होते ते भोगून झाले आहे, असे त्यांनी अधिक म्हटले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :संजय राऊतमनसेराज ठाकरेमहाराष्ट्रशिवसेना