मुंबई : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे महापालिका क्षेत्रातून दररोज निर्माण होणाऱ्या ९ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. त्यापैकी ३ हजार मेट्रिक टन कचरा कांजूरमार्ग येथील प्रकल्पात वाहून नेण्यात येत आहे. आता हा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. बायोरिअॅक्टर तंत्रज्ञानाच्या आधारे व प्राणवायूविरहित (अनॉरोबिक) पद्धतीने प्रक्रिया करणारा हा देशातील पहिला प्रकल्प ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित झाला असून त्यातून गॅसची निर्मितीदेखील सुरू झाली आहे.महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे या प्रकल्पामुळे जवळपासच्या परिसरात दुर्गंधी पसरण्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. शिवाय प्रकल्पात येणाऱ्या कचऱ्यावर पर्यावरण सुसंगत पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत आहे. प्रकल्पातील कचरा हा ‘लाइनर सिस्टीम’वर टाकला जात आहे. तो सर्व बाजूंनी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपासची हवा व भूजल प्रदूषित होणार नाही. साहजिकच हा प्रकल्प पर्यावरण सुसंगत असणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व संबंधित प्राधिकरणांनी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तसेच प्रकल्पावर संबंधित सर्व प्राधिकरणांची नियमित देखरेख आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत कचऱ्यातून गॅसनिर्मिती सुरू
By admin | Published: October 08, 2015 5:17 AM