Join us  

गुड न्यूज, रविवारपासून धाे-धाे पाणी, वेळेआधीच गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या जलबोगद्याची दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 2:04 PM

Mumbai: पाणी कपातीने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. पालिकेने ३० एप्रिलऐवजी २३ एप्रिल पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित असल्याचे कळविले आहे. 

मुंबई : पाणी कपातीने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. पालिकेने ३० एप्रिलऐवजी २३ एप्रिल पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित असल्याचे कळविले आहे. 

मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडूप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसांत पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरून कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे येत्या रविवारपासून मुंबईकरांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू होणे अपेक्षित आहे.

भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडूप संकुल दरम्यानच्या ५,५०० मिलिमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. 

ही गळती दुरुस्तीसाठी संबंधित जलबोगदा ३१ मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला होता. यामुळे महापालिका क्षेत्रात ३१ मार्चपासून ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्के कपात जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे पाण्याविना हाल होत होते. तसेच अनेक ठिकाणी टँकरशिवाय पर्याय नसल्याचेही समोर आले. 

दुरुस्तीचे आव्हानात्मक काम कसे केले पूर्ण?    जलबोगदा दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी जल अभियंता खात्याने, पर्यायी जुन्या जलवाहिन्यांद्वारे भांडूप संकुलापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि जलबोगदा बंद करून त्यातील पाणी उपसण्यात आले.     प्रत्यक्ष दुरुस्ती करताना भांडूप व कापूरबावडी येथील झडपेचे (शाफ्ट) पोलादी घुमट (डोम) कापून क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आले. ३,७५० मिलिमीटर व्यासाच्या सर्वात मोठ्या झडपेचे यशस्वीरीत्या नियंत्रण केले. तसेच जलवाहिन्या व जल बोगद्यावरील अन्य झडपांचेही नियंत्रण करण्यात आले.    भगदाड पडून हानी पोहोचलेल्या ठिकाणी आत पॅकर टाकून विशिष्ट अशा ग्राउटिंगने पाणी गळती बंद केली. आतील दुरुस्ती पॅकर व पोलादी प्लेटच्या सहायाने पूर्ण केली. त्यानंतर वागळे इस्टेट येथील १०० मीटर खोलीच्या कूपनलिकेमध्ये विशिष्ट प्रकारचे सिमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकून ते बंद करण्यात आले.येत्या ३ ते ४ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववतदुरुस्ती पूर्ण केल्यानंतर आता हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मुंबई महानगराचा पाणीपुरवठा येत्या रविवारपासून पूर्ववत होणे अपेक्षित आहे. 

टॅग्स :मुंबईपाणी