मुंबई-
राज्यातील ७७५१ ग्रामपंचायती निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कलही हाती येऊ लागले आहेत. यात भाजपानं आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकेल असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या दाव्याचा समाचार घेतला आहे. नैरोबी आणि केनियातही ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, मग तिथंही भाजपा निवडून आल्याचा दावा करेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"ग्रामपंचायतीचा दावा कधीच कुणी करू नये. कारण जिथं पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या जातात तिथंच पक्षांनी दावा करावा. ग्रामपंचायतीच्या निवडणुका कशा लढवल्या जातात हे आता काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. आता नैरोबी आणि केनियामध्येही ग्रामपंचायत निवडणूक झालीय तिथंही भाजपा दावा करेल. म्हणेल भाजपा तिथंही निवडून आलंय", असं संजय राऊत म्हणाले.
संसद भवन बदलता येईल, पण इतिहास बदला येणार नाही"तुम्ही सारं बदलू शकता पण इतिहास बदलता येणार नाही. तुम्ही संसद भवन बदलू शकता, राजपथाचं नाव बदलू शकता पण इतिहास कधीच बदलू शकत नाही. काँग्रेसच्याच नेतृत्वात देशाचा स्वातंत्र्यलढा लढला गेला हा इतिहास आहे. स्वातंत्र्यासाठी इंदिरा गांधीही तुरुगांत गेल्या होत्या. आज जे सरदार वल्लभभाई पटेल आमचे म्हणत आहेत ते सरदार वल्लभभाई देखील काँग्रेसचेच आहेत. भाजपा पुस्तकं बदलू शकतं, पण काँग्रेसचं योगदान, बलिदान नाकारता येणार नाही. इतिहास कधीच पुसला जाऊ शकत नाही. जर तुमचंही स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे मग ते दाखवून द्या", असं संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम