Join us  

सालेमला फाशी द्या; सरकारी पक्षाची मागणी

By admin | Published: February 18, 2015 2:32 AM

प्रदीप जैन खूनप्रकरणी गँगस्टर अबू सालेम व मेहंदी हसन या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाने विशेष टाडा न्यायालयात मंगळवारी केली़

मुंबई : प्रदीप जैन खूनप्रकरणी गँगस्टर अबू सालेम व मेहंदी हसन या आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी सरकारी पक्षाने विशेष टाडा न्यायालयात मंगळवारी केली़विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही मागणी केली़ ते म्हणाले, हा खून क्रूर पद्धतीने केलेला नाही़ पण हा खून केल्यानंतर सालेमला याचा पश्चात्ताप झाला नव्हता़ उलट त्याने जैन यांच्या पत्नीला बोलावून खंडणीची उर्वरित रक्कम देण्यासाठी धमकावले़ तसेच खंडणी न दिल्यास जैन कुटुंब संपवून टाकेन, असाही दम सालेमने जैन यांच्या पत्नीला दिला होता़ त्याचे हे कृत्य तालिबानी अतिरेकी वृत्तीचे आहे़ त्याला संपूर्ण जैन कुटुंब संपवायचे होते़ तेव्हा त्याला केवळ जन्मठेपेची शिक्षा दिल्यास तो समाजासाठी अधिक घातक ठरेल़ त्यामुळे सालेमला फाशीचीच शिक्षा ठोठवावी, अशी मागणी अ‍ॅड़ निकम यांनी केली़ तसेच हसन याने या खुनात महत्त्चाची भूमिका बजावली असल्याने तोही फाशीस पात्र आहे़ मात्र यातील तिसरे आरोपी वीरेंद्रकुमार यांचा या घटनेत महत्त्वपूर्ण सहभाग नव्हता़ ते आता ८६ वर्षांचे आहेत़ त्यामुळे वीरेंद्रकुमार यांना सात वर्षांची शिक्षा ठोठवावी, अशी विनंती अ‍ॅड़निकम यांनी न्यायालयाला केली़याला सालेमचे वकील सुदीप पासबोला यांनी विरोध केला़ ते म्हणाले, सालेमला कठोर शिक्षा ठोठावली जाणार नाही, या अटीवरच भारताने सालेमचा ताबा पोर्तुगालकडून घेतला आहे़ असे असताना त्याला फाशीची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी करणे योग्य नाही़ जगभरात याने भारताबाबत चुकीचा संदेश जाऊ शकतो़ त्यातही जैन यांचा खून ही घटना विरळातील विरळ नसल्याचा निर्वाळा खुद्द सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे़ तेव्हा सालेमला फाशी देणे योग्य ठरणार नाही, असा दावा अ‍ॅड़ पासबोला यांनी केला़ हा युक्तिवाद उद्या, बुधवारीही सुरू राहणार आहे़जुहू येथील बंगल्याबाहेर जैन यांची १९९५मध्ये गोळ्या झाडून हत्या झाली़ यासाठी विशेष टाडा न्यायालयाने सालेमसह हसन व वीरेंद्रकुमार यांना दोषी धरले आहे़ त्याच्या शिक्षेबाबत सध्या युक्तिवाद सुरू आहेत. (प्रतिनिधी)