Join us  

कचरा नियमितपणे टाकणाऱ्यांना भरभक्कम दंड आकारा!

By मनोहर कुंभेजकर | Published: May 01, 2023 4:58 PM

वर्सोव्यातील स्वच्छता प्रेमी नागरिकाची पालिका प्रशासनाकडे मागणी

मनोहर कुंभेजकर, मुंबई: स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई साठी पालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते.रोज मुंबईचा सुमारे 6000 मेट्रिक टन कचरा पालिकेचे स्वच्छता दूत गोळा करून नंतर  तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. महानगरपालिकेतर्फ कचरा न टाकण्याचे आवाहन नागरिकांना वारंवार केले जाते. मुंबई महानगरपालिकेने तसा बॅनरही लावला आहे. रस्त्यावर कचरा न टाकता पालिका प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. तरीही नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात.

अंधेरी पश्चिम,वर्सोवा स्वामी समर्थ येथे असलेल्या एमटीएनएलच्या पिलरमध्ये उंदीर व घुशी घूसून पिलरची वाट लागू नये म्हणून एमटीएनएल आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे पिलर जवळ कचरा न टाकण्याचे आवाहन वारंवार केले जाते. मुंबई महानगरपालिकेने तसा बॅनरही लावला आहे. तरीही मुंबई मनपाची विनंती धुडकावून सदर जागी बॅनर समोरच कचरा नियमितपणे टाकला जातो. एमटीएनएलचा पिलर पूर्णपणे खराब झाल्यास कित्येक टेलिफोन लाईन्स बंद पडतील हे सांगायला नको. एरवी मुंबई मनपाच्या नांवाने खडे फोडणारे नागरिक किती बेजबाबदार आहेत याचे हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कचरा नियमितपणे टाकणाऱ्यांना भरभक्कम दंड आकारा अशी मागणी येथील स्वामी समर्थ नगर येथील स्वच्छता प्रेमी नागरिक  राजू वेर्णेकर यांनी केली आहे.

असोसिएशन ऑफ अपनाघर कोऑपरेटीव्ह सोसायटीज तर्फे येथील कारभार पाहिला जातो. शेवटी या असोसिएशनला भरभक्कम दंड आकारल्या नंतरच हा उपद्रव कदाचित थांबेल असे आजचे चित्र असल्याचे वेर्णेकर यांनी लोकमतला सांगितले.