Join us  

मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:36 PM

Mumbai Rains : आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Mumbai Rains :  मुंबई : मुंबईमध्ये गेल्या ५ तासांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरु आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कुर्ला ते भांडूपदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. 

भारतीय हवामान विभागाने उद्या (२६ सप्टेंबर) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अलर्ट आहे. या रेड अलर्टमुळे नागरिकांनी अनाश्यक घराबाहेर पडणं टाळावं, तसंच आपत्कालिन परिस्थितीमध्ये तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. याचबरोबर, मुंबईतील मुसळधार पावसामुळे महापालिका आयुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीच्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.  

रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वॉर्डाच्या कार्यकारी अभियंत्याला वॉर्ड कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहण्यास सांगितले आहे. सर्व वॉर्डातील एका अधिकाऱ्यांला पुढील सर्व अपडेट्ससाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य अभियंता, स्ट्रॉम ड्रेनेज विभाग SWD कर्मचारी यांनी निर्जलीकरण पंप चालू आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी सांगण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार, पुढील कार्यवाही करण्यासाठी उपमुख्य अभियंता झोन यांना आज रात्री आपापल्या परिमंडळात उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुटी जाहीर भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक २६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

विमानं हैदराबादकडे वळवलीदिल्लीहून मुंबईला येणारी विमानं देखील हैदराबादकडे वळवण्यात आली आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विमानं हैदराबादकडे वळवण्यात आली आहेत.

टॅग्स :मुंबईपाऊस