मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना ‘गरीब रुग्ण सहाय्यता निधी’तून मदत देत दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या वर्षी एप्रिल ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत एकूण १५ कोटी ६५ लाख ७२ हजार ८१९ रुपयांच्या आर्थिक मदतीद्वारे ११ हजार ६४१ गरीब रुग्णांना दिलासा देण्यात आला आहे.महापालिकेद्वारे ज्या विविध नागरी सेवा सुविधा देण्यात येतात त्यामध्ये वैद्यकीय व आरोग्य विषयक सेवांचा प्राधान्याने समावेश होतो. पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर माफक दरात उपचार केले जातात. मात्र अनेक रुग्णांना तेवढाही खर्च परवडत नाही. अशा रुग्णांना ‘गरीब रुग्ण सहाय्यता निधी’द्वारे मदत केली जाते.आर्थिक दृष्टया कमकुवत घटकातील गरजूंना दिलासा मिळावा; या उद्देशाने १९२६ सालापासून पालिकेच्या रुग्णालयांमधून ‘गरीब रुग्ण सहाय्यता निधी’ची सुरूवात केली. यात विविध घटकातील लोक तसेच संस्था, कंपन्या त्यांचे आर्थिक योगदान देतात. राज्य सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये ज्या प्रकारचे वैद्यकीय उपचार संलग्न नाहीत. तसेच कोणत्याही सेवाभावी संस्थेकडून वित्तीय सहाय्य मिळणे शक्य नसते; अशा परिस्थितीत उपचार अथवा शस्त्रक्रियाकरीता गरजूंना अर्थसहाय्य देण्यात येते. (प्रतिनिधी)
रुग्णांना मदतीचा हात
By admin | Published: November 12, 2015 12:26 AM