Join us  

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीचं नेमकं कसं घडलं? शरद पवारांनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 12:25 PM

शरद पवारांचे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र चांगलंच गाजलं. महाराष्ट्रात हे पुस्तक म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासाची उजळणी करणारं पर्व ठरलं

मुंबई - राज्यात भल्या सकाळी स्थापन झालेलं फडणवीस-पवार यांचं सरकार हा राजकीय इतिहासातील कधीही न पुसणारा डाग आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पहाटेचा शपथविधी म्हणून राज्यासह देशात या सत्ता स्थापनेची चर्चा झाली. मात्र, काही तासांतच हे सरकार पडलं आणि भाजप-राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेचा प्लॅन फसला. या शपथविधीवरुन सातत्याने चर्चा होते, विचारणा होते. मात्र, वेळ आल्यावर सर्वकाही सांगू असे, दोन्ही नेते म्हणतात. आता, या शपथविधीसंदर्भात स्वत: शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून खुलासा केला आहे. अजित पवारांनी उचललेलं हे पाऊल अत्यंत गैर असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.  

शरद पवारांचे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र चांगलंच गाजलं. महाराष्ट्रात हे पुस्तक म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासाची उजळणी करणारं पर्व ठरलं. आता, या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या दुसऱ्या भागात २०१५ पासून ते २०२३ पर्यंतच्या अनुभवी आणि प्रसंगारुप घटनांची माहिती शरद पवार यांनी लिहिली आहे. त्यातच, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन केलेल्या शपथविधीवरही पवार यांनी खुलासा केलाय. 'अजित पवारांनी उचललेलं पाऊल अत्यंत गैर होत. माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेलं, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी या पुस्तकात केला आहे. 

तो मोठा धक्का होता

२३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, आजत पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,' अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता. 'महाविकास आघाडी'चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकीच एक- दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं. 

शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन

‘महाविकास आघाडीचा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. ‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,' असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं. राष्ट्रवादीच्या काही आमदारांना माझ्या नावाचा गैर वापर केला, असे पवार यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात लोक माझे सांगाती या पुस्तकात लिहिले आहे.

असं मोडलं अजित पवारांचं बंड

त्यानंतर आम्ही पहिला निर्णय घेतला, तो बंड मोडुन काढण्याचा. आमच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सहकाऱ्यांशी बोलून गेलेल्या सर्व आमदारांना परत आणण्यासाठी पावलं उचलायला मी सांगितली. 'चव्हाण प्रतिष्ठान'ला राष्ट्रवादीचे चोपन्नपैकी पन्नास आमदार उपस्थित असल्यानं तशीही बंडातली हवा निघालीच होती. तरीही महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत नेमकी माहिती पोहचणं आवश्यक होतं. त्याचाच भाग म्हणून आम्ही पत्रकारपरिषद घेतली. दुपारी झालेल्या या पत्रकारपरिषदेला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहिल्यानं 'महाविकास आघाडी' अभेद्य असल्याचा पक्का संदेश गेला, असंही शरद पवार यांनी पुस्तकातून सांगितलंय. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारदेवेंद्र फडणवीस