Join us  

कचऱ्याची विल्हेवाट लावायची तरी कशी? कचरा वाहतुकीमध्ये मोठी वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 2:58 PM

२०२० व २०२२ मध्ये यात १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचा निष्कर्ष प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

मुंबई : बदलत्या वातावरणामुळे तसेच अकार्यक्षम स्वच्छता, कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमुळे मुंबईला वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित पाण्याचे स्त्रोत अशा गंभीर समस्या भेडसावत आहेत. गेल्या दहा वर्षात नागरिकांच्या कचरा विल्हेवाटीच्या तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरातील डम्पिंग ग्राउंडवर रोज वाहतूक केला जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याचा पालिकेचा उद्देशही सफल झालेला नाही. २०२० व २०२२ मध्ये यात १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचा निष्कर्ष प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

बदलते वातावरण व कचऱ्याचे व्यवस्थापन होत नसल्याने मुंबईकरांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. २०१३ पासून २०२२ पर्यंत नागरिकांच्या वायू प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये २३७ टक्क्यांनी तर घनकचरा व्यवस्थापनाच्या तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२२ मध्ये स्वच्छ भारत अभियानांतील कचरा मुक्त शहर या योजनेंतर्गत पंचतारांकित मूल्यांकन मिळविण्यात पालिका अपयशी ठरल्याचे निरीक्षण प्रजा फाऊंडेशनने मांडले आहे. २०१८ - २०१९ पर्यंत कचऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यावेळी मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट सोसायटींमध्येच लावण्याचे पालिकेने बंधनकारक केले होते. 

शून्य कचरासाठी बदल आवश्यक घनकचरा व्यवस्थापन, मलनिसारण आणि हवा व पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले आहे. मुंबईला वायू प्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित पाण्याचे स्त्रोत अशा गंभीर समस्या वेगाने होणाऱ्या हवामान बदलामुळे तसेच अकार्यक्षम स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमुळे भेडसावत आहेत. शून्य कचरा ध्येय गाठण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन नियमावली २००६ मध्ये २०१६ प्रमाणे नियमानुसार बदल करणे आवश्यक आहे.

टॅग्स :कचरा प्रश्नमुंबई