Join us  

कुळकर्णींच्या कानफटात हाणा - राज

By admin | Published: October 26, 2015 12:41 AM

सुधींद्र कुळकर्णींना काळे फासले, पण त्यांचा प्रकाशनाचा कार्यक्रम थाटात झाला. काळे फासून काय मिळाले? त्याऐवजी त्यांच्या कानफटात हाणायला हवी होती.

कोळसेवाडी : सुधींद्र कुळकर्णींना काळे फासले, पण त्यांचा प्रकाशनाचा कार्यक्रम थाटात झाला. काळे फासून काय मिळाले? त्याऐवजी त्यांच्या कानफटात हाणायला हवी होती. पाकिस्तानच्या प्रश्नावरून अशी छोटीमोठी आंदोलने करण्यापेक्षा अटलजींच्या काळात सुरू झालेली समझोता एक्स्प्रेस बंद करा, साद-ए-सरहद्द ही लाहोर-दिल्ली बससेवा बंद करा. कारण, त्या माध्यमातून हजारो पाकिस्तानी येथे येत आहेत, पण जाताना दिसत नाहीत. आपण केंद्रात सत्तेत आहात ना? हे जर करता येत नसेल तर सत्ता सोडा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला कल्याण पूर्व येथील जाहीर सभेत बोलताना दिला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमराई येथे पार पडलेल्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी यांनी पेट्रोल, डिझेलवर कर लावला. त्याचाच अर्थ शासनाकडे पैसा नाही? मग, कल्याण-डोंबिवलीला ३५०० कोटींचे पॅकेज कसे काय जाहीर करता? ज्या गोष्टी बोलून मते मिळवली आणि सत्ता हाती येताच आम्ही अच्छे दिन आयेंगे, असे बोललोच नाही, असे त्यांचे नेते म्हणतात. सरकार बदलले म्हणतात. थोबाडे तीच आहेत. सरकार नवीन येऊन काहीच उपयोग झाला नाही. डाळींपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले, मग अच्छे दिन कोठे आले? गेल्या साडेतीन वर्षांमध्ये नाशिकचा कायापालट केला. सुंदर रस्ते, उद्याने निर्माण केली. लवकरच नाशिकला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शस्त्रात्रांचे म्युझियम बनवणार असून त्या म्युझियमला बाळासाहेबांचे नाव देणार असल्याची घोषणा केली.गेल्या २० वर्षांत कल्याण-डोंबिवलीत १५००० कोटी रुपये विकासासाठी आले? कोठे गेले ते पैसे? एक-दोन सिमेंटचे रस्तेवगळता शहरांची वाट लावली. आम्हाला एकहाती सत्ता द्या. खऱ्या अर्थाने शहरांचा विकास घडवू, असेही त्यांनी म्हटले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निमित्त शिवसेनेला मुद्दाच नाही उरला. भारतरत्न पुरस्काराच्या पलीकडे गेलेल्या स्वातंत्र्ययुद्धातील त्यागी पुरुषांसाठी कसले पुरस्कार मागता? काहीच नाही तर मग तुमचे एक मत म्हणजेच बाळासाहेबांना श्रद्धांजली, असे भावनिक आवाहन करायचे. राम मंदिर पाडल्यानंतर माझ्या उपस्थितीत ते मंदिर पाडले नाही, शिवसैनिकांनी पाडले, असे वक्तव्य एका नेत्याने करताच बाळासाहेब तत्काळ म्हणाले की, मंदिर जर शिवसैनिकांनी पाडले असेल तर त्यांचा मला अभिमान आहे. असा नेता पाहिजे, असे ते म्हणाले.