Join us  

आदिवासींच्या पाण्याची कंपन्यांना बेकायदा विक्री

By admin | Published: May 26, 2014 5:03 AM

पिण्याचे पाणी पळवून ते विविध कंपन्यांना विकण्याचा धडाका स्थानिक टँकर लॉबीने लावल्याने ऐन उन्हाळ्यात आदिवासी कुटुंबांचे व ग्रामीण जनतेचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत

भिवंडी : तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील पिण्याचे पाणी पळवून ते विविध कंपन्यांना विकण्याचा धडाका स्थानिक टँकर लॉबीने लावल्याने ऐन उन्हाळ्यात आदिवासी कुटुंबांचे व ग्रामीण जनतेचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. भिवंडी-वाडा रोडवरील कवाड ग्रामपंचायत हद्दीतील मौजे विश्वभारती फाटा या ठिकाणी सुमारे ५०० लोकसंख्या असलेल्या गावाला जिल्हा परिषद पाणीपुरवठा योजनेतून नळयोजना सुरू होती. याठिकाणी शासनाच्या ३ बोअरवेल आहेत. मात्र, बोअरवेल व शासकीय विहिरीच्या जवळपास खासगी मालकांनी बोअरवेल घेऊन त्यामधून पाण्याचा मशीनद्वारे रात्रंदिवस उपसा करून किमान रोज २०० टँकर पाणी कापडावर प्रक्रिया करणार्‍या डाइंग व इतर कंपन्यांना विकत असल्याने शासनाच्या बोअरवेल व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील विश्वभारती फाटा, उगलेपाडा, नित्यानंद कॉलनी, वाघिवली, तळ्याचा पाडा, मडक्याचा पाडा, कासपाडा आदि भागांतील आदिवासी व ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. या टँकर लॉबीवर निर्बंध आणून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, याकरिता श्रमजीवी संघटनेमार्फत जिल्हा सचिव बाळाराम भोईर, तानाजी लहांगे व इतर पदाधिकार्‍यांनी मिळून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)