Join us  

मुंबईतील वाहने जातात कुठे? ४ महिन्यांत वाहन चोरीचे ८९५ गुन्हे, ४१७ गुन्ह्यांची उकलच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 11:07 AM

मुंबईत वाहन चोरीच्या घटनांत मोठी वाढ होत असून, गेल्या चार महिन्यांत वाहन चोरीसंबंधित ८९५ गुन्हे नोंद झाले आहेत.

मुंबई : मुंबईत वाहन चोरीच्या घटनांत मोठी वाढ होत असून, गेल्या चार महिन्यांत वाहन चोरीसंबंधित ८९५ गुन्हे नोंद झाले आहेत. यापैकी केवळ निम्म्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिलदरम्यान मुंबईत एकूण १८ हजार ७८६ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी १२ हजार ९३० गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले. या आकडेवारीनुसार दिवसाला सात ते आठ वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईत वाहन चोरीचे एकूण ८९५ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी ४७८ गुन्ह्यांची उकल झाली. गेल्या वर्षी याच चार महिन्यांत मुंबईत ८२९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. 

अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यात समावेश -

अल्पवयीन मुलेही चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात अडकताना दिसत आहे. काही जण झटपट पैसा कमावण्यासाठी, तर अनेक जण बेरोजगारी, तसेच मौजमजेसाठी चोरीचा मार्ग अवलंबताना दिसून येत आहे.

रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्यांचे पार्ट  विक्री करतात. मुंबईतही अनेक गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी करतात, तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजिन नंबर लावत त्यांची विक्री करतात. 

भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करण्यात येतात. त्याच बनावटीची दुचाकी शोधून त्या दुचाकीची चोरी करायचा. सोशल मीडियावरही विक्री करताना दिसून आले.

गुजरात, राजस्थान,मध्य प्रदेश, यूपीत वापर-

१) मुंबई पोलिसांनी २०१८ मध्ये मोटार वाहन चोरीविरोधी पथक बंद करण्याचा निर्णय घेतला. 

२) हे पथक मालमत्ता कक्षात विलीन करण्यात आले आहे. 

३) चोरी होणाऱ्या बहुतांश गाड्या गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटकमध्ये नेण्यात येतात. 

४) या वाहनांचा मुख्यत्वे गुन्हे करण्यासाठी वापर करण्यात येतो.

५) त्यामुळे एखादी वाहन चोरांची टोळी पकडली गेल्यास किमान १० ते १५ गुन्ह्यांची उकल होत असल्याचे पोलिस कारवाईतून दिसून आले आहे. 

६) त्यामुळे वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी वेगळ्या पथकाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसचोरी