Join us  

चार जलाशय काठोकाठ, पाणीचिंता मिटली; मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 10:01 AM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून १० टक्के पाणी कपात मागे घेण्यात आली आहे. ठाणे शहर, भिवंडी व नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतींना महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपातही मागे घेण्यात आली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात जवळपास ७४ टक्के पाणीसाठा जमा झाला असून, पुढील २६४ दिवस, म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध झाला आहे.

यंदा जून संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा घटला होता. त्यामुळे पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

भातसा धरणही ७० टक्क्यांहून अधिक भरले-

१) सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत १० लाख ६७ हजार ७०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. 

२) सात धरणांपैकी तुळशी, तानसा, विहार, मोडकसागर जलाशय काठोकाठ भरले आहेत. तर सर्वांत मोठे भातसा धरणही ७० टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

सातही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ-

ठाणे शहर, भिवंडी व नगरबाह्य विभागातील ग्रामपंचायतींना मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात लागू केली होती. परंतु जुलैमध्ये आतापर्यंत कोसळलेल्या पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत-

१) मुंबईत पावसाने रविवारी विश्रांती घेतली. धरण क्षेत्रातही तुरळक पाऊस झाला. ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा सोमवारी पहाटे ७३.७७ टक्के झाला होता.

२) सातपैकी चार जलाशये काठोकाठ भरली आहेत. मुंबईच्या हद्दीतील विहार, तुळशी या जलाशयांबरोबरच तानसा आणि मोडकसागर धरणही भरल्यामुळे १० टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

३) पाणी कपात रद्द केल्याने पाणी वितरण व्यवस्थेच्या टोकाच्या वस्त्या, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणी