Join us  

रमाबाई आंबेडकर नगर बाधितांची पात्रता निश्चिती; ७,६२९ रहिवाशांच्या घरांचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:16 AM

घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पातील १४ हजार २५७ रहिवाशांपैकी ७ हजार ६२९ रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यात आली आहे.

मुंबई :घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पातील १४ हजार २५७ रहिवाशांपैकी ७ हजार ६२९ रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यात आली आहे. उर्वरित रहिवाशांना पात्रता निश्चिती करण्यासाठी पुढील दोन महिन्यात कागदपत्रे सादर करता येणार आहे. त्यानंतर पात्र रहिवाशांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) अधिकाऱ्यांनी दिली.

एमएमआरडीएकडून रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १४,२५७ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्या माध्यमातून हे पुनर्वसन केले जाणार आहे. सद्यस्थितीत एसआरएच्या माध्यमातून या भागातील बाधित झोपड्यांचे सर्वेक्षण, रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. 

करार करण्यास सुरू-

पात्रता निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या रहिवाशांबरोबर करार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत १,५०० रहिवाशांबरोबर करार करण्यात आले आहेत. एमएमआरडीएकडून या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी घरभाडे दिले जाणार आहे. घर भाड्याचे पैसे दिले जाताच ही घरे रिकामी केली जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

वास्तुविशारदासाठी निविदा-

आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पासाठी वास्तुविशारद नेमण्याची प्रक्रिया एमएमआरडीए सुरू केली आहे. यासाठी वास्तूविशारद नेमणूकीसाठी मागविलेल्या निविदांना तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. यातील लघुतम निविदा सादर केलेल्या सल्लागाराला काम देण्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरु केली आहे. कार्यकारी समितीच्या बैठकीत लवकरच याबाबत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यानंतर कार्यादेश दिले जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एसआरएमार्फत आतापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्गाच्या लगतच्या १६९४ पैकी १०२९ झोपड्यांची आतापर्यंत पात्रता निश्चिती केली आहे. या प्रकल्पातील अद्यापपर्यंत १४,२५७ पैकी ७,६२९ रहिवाशांची पात्रता निश्चिती झाली आहे. मात्र, अनेक रहिवासी या प्रक्रियेत अपात्र ठरले आहे. या रहिवाशांना पुढील दोन महिन्यात आवश्यक कागदपत्रे सादर करून पात्रता निश्चिती करुन घेता येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :मुंबईघाटकोपरएमएमआरडीए